पावती फाडण्यावरून वाद, हॉटेलमध्ये घुसखोरी करून उन्माद
साईमत/ पाचोरा/प्रतिनिधी –
पाचोरा शहरातील हॉटेल ‘भाग्यलक्ष्मी पॅलेस’ तसेच हॉटेल दाजीबा पॅलेस येथे शिवजयंतीच्या पावतीवरून झालेल्या वादातून काही जणांनी जबरदस्तीने घुसून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करून व्यापाऱ्यांना धमकावण्याच्या प्रवृत्तीमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हॉटेलचे संचालक तुषार मराठे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे थेट न्यायाची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती हॉटेल भाग्यलक्ष्मी पॅलेसमध्ये शिवजयंतीची पावती फाडण्याच्या उद्देशाने आल्या होत्या. यावेळी हॉटेलचे मालक बाहेरगावी असल्याने ते फोनवरून चर्चा करत असतानाच संबंधित टोळक्याने आक्रमक भूमिका घेत रागाच्या भरात हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. खुर्च्या, टेबल्स आणि इतर साहित्याचे नुकसान करण्यात आले. ही संपूर्ण घटना हॉटेलमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत स्पष्टपणे कैद झाली असून, पुरावे उपलब्ध आहेत.
या घटनेमुळे व्यापारी वर्गात तीव्र अस्वस्थता पसरली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा घटनांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे. “व्यापारीच सुरक्षित नसतील तर राज्याची प्रगती कशी होणार?” असा सवाल उपस्थित करत तुषार मराठे यांनी सांगितले की, एक मराठा समाजाचा तरुण कष्टाने उद्योग उभा करतो आणि त्यालाच स्वकीयांकडून अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतो, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, दोषींना कोणतीही पाठीशी घालण्याची भूमिका घेऊ नये, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. शिवजयंतीसारख्या पवित्र उत्सवाच्या नावावर दहशत माजवणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालणे गरजेचे असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्वरित तपास करून कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
