प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाणे विक्रेत्यांचे गुजरातसह मध्य प्रदेशात धागेदोरे
जळगाव (प्रतिनिधी)-
चोपडा तालुक्यात एप्रिल महिन्यात कृषी विभागाने १८ लाख रुपयांचे प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाणे जप्त केले होते. आता पुन्हा चोपड्यातच १२ लाख ७२ हजारांचे एचटीबीटी बियाणे जप्त करण्यात आले. विक्रेत्यांचे गुजरातसह मध्य प्रदेशात धागेदोरे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील शेतकरी साधारणपणे मे महिन्याच्या प्रारंभी पूर्वहंगामी उन्हाळी कपाशीच्या लागवडीला सुरूवात करतात. यंदाही सर्वत्र कपाशी लागवडीची लगबग सुरू झाली असताना, गुजरातसह मध्य प्रदेशातून चोरट्या मार्गाने जिल्ह्यात विक्रीसाठी आलेले प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे अनेक ठिकाणी उपलब्ध होत आहे. एचटीबीटी कपाशीच्या बियाण्याचा वापर केल्यामुळे तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे सहज शक्य होते. निंदणीसाठी मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो.
मजुरांची अनुपलब्धता असली तरी फरक पडत नाही. यामुळे अनेक शेतकरी बेकायदेशीर मार्गाने विक्रीसाठी आणल्या गेलेल्या एचटीबीटी बियाण्यांची खरेदी करतात. त्या बियाण्याला केंद्र सरकारची परवानगी नाही. हे बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला कोणतीच पावती दिली जात नाही. पुढे उगवण क्षमता किंवा उत्पादनाविषयी अडचणी आल्यास कोणाकडे तक्रार देण्याची सोय नाही. तरीही शेतकरी दलालांच्या जाळ्यात अडकून कपाशीचे एचटीबीटी बियाणे जास्तीचे पैसे देऊन खरेदी करत आहेत. तणनाशकाचा सातत्याने आणि प्रमाणाबाहेर वापर झाल्यास जमिनीचा पोत बिघडतो. दीर्घकालीन शेतीला धोका निर्माण होतो. अल्पमुदतीचा फायदा घेण्यासाठी शेतकरी दीर्घकालीन नुकसानाला आमंत्रण देत आहेत.