साईमत, धुळे । प्रतिनिधी
जिल्ह्यातील चंदन उत्पादक शेतकऱ्याच्या शेतातून रात्रीतून चक्क ६५ चंदनाच्या झाडांची तस्करी केल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्याला या चोरीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. याकडे पोलिसांनी देखील लक्ष देण्याची गरज आहे. चंदन तस्करीसारख्या घटनांमुळे जीव धोक्यात घालून कोणीही चंदनाचे उत्पन्न घेणार नाही, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या भोरखेडा येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्रसिंग लोटनसिंग राजपूत यांनी १५ वर्षांपूर्वी आपल्या तीन एकर क्षेत्रात एक हजार पांढऱ्या चंदनाच्या झाडांची लागवड केली होती. या क्षेत्राच्या चौफेर बाजुने काटेरी झुडपे लावण्यात आली आहेत. संपूर्ण कुटुंब रात्रंदिवस या चंदनाच्या झाडांची काळजी घेत असतात.आता यातील काही चंदनाचे झाड हे परिपक्व झाले आहेत. मात्र यांच्या या चंदनाच्या झाडावर चंदन तस्करांनी लक्ष केंद्रित केले आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी चंदन तस्करांनी शेतातील २५ चंदनाची उभी झाडे कापून नेली होती. त्यासोबत ७० पेक्षा जास्त झाडांना करवत लावून कापण्याचा प्रयत्न झाला होता. तर काल रात्री पुन्हा ४० चंदनाच्या झाडांची तस्करी करण्यात आली आहे. या घटनेमुळे शेतकरी चिंतेत आहे. त्यांच्या ६५ चंदनाच्या झाडांच्या तस्करीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे.
तस्करांनी करवतने काही भाग कापून तपासणी करून परिपक्व असलेले चंदनाची झाडे कापली. त्या झाड आणि खोडमधील भाग कापून शेतापासून काही अंतरावरील कापसाच्या शेतात घेऊन गेले. तेथे त्यामधील चंदनाचा महत्त्वाचा गाभा काढण्यात आणि त्या गाभाची तस्करी करण्यात आली आहे. यापूर्वी देखील दोन व्ोळा भरतसिंग राजपूत यांच्या चंदनाच्या शेतातून चंदन झाडांची तस्करीची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून देखील योग्य दखल घेण्यात येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पांढऱ्या चंदनाच्या झाडांची किंमत ही अंदाजे एक घनफुट ६ ते १० हजार रुपये इतकी असून एका झाडावर १५ ते २० घनफुट चंदन असते. त्यामुळे या ६५ झाडांच्या तस्करीमुळे लाखोंचे नुकसान शेतकऱ्याला झाले आहे.