साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
पावसाच्या खंडाबाबत महसूल, कृषी एवढच काय हवामान विभागाकडे माहिती आहे. असे असताना केवळ तीन महसूल मंडळाचा समावेश कुठल्या आधारावर झाला? हा भेदभाव तालुक्यातील उर्वरित सहा मंडळातील शेतकऱ्यावर अन्याय करणारा आहे. तालुक्यातील सर्वच्या सर्व नऊ महसूल मंडळांचा पीक विमा नुकसान भरपाईमध्ये समावेश व्हावा, अशी मागणी चाळीसगड विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी केली आहे. अशा आशयाचे निवेदन त्यांनी तालुका कृषी यांना दिले आहे. त्याच्या प्रती पालकमंत्री, आमदार, तहसीलदार यांनाही रवाना केल्या आहेत.
तालुक्यात गेल्या महिनाभर पावसाने दडी मारली आहे. ही परिस्थिती तालुक्यातील नऊ महसूल मंडळात सारखी आहे. सलग २१ दिवसाचा पावसाने खंड दिला आहे. पावसाचा सलग २१ दिवसांचा खंड असेल तर पीक विम्याची २५ टक्के रक्कम तातडीने अदा करणे बंधनकारक आहे. तालुक्यातील सर्व नऊ महसूल मंडळामध्ये २१ दिवसापेक्षा अधिक खंड पडला आहे. असे असताना चाळीसगाव तालुक्यात फक्त तीन महसूल मंडळाच्या नुकसानीचा समावेश केल्याची खात्रीलायक माहिती आहे.