साईमत/ न्यूज नेटवर्क । मुक्ताईनगर।
राष्ट्रीय महामार्ग बऱ्हाणपूर-अंकलेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण मुक्ताईनगर तालुक्यातून न करता पूर्वीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा येथून करणे तसेच रस्त्याचे सध्या सुरु असलेले देखभाल दुरुस्ती तात्काळ सुरु करण्याबाबत ठेकेदाराला आदेश देण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली. त्यावर त्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिले.
मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय महामार्ग बऱ्हाणपूर-अंकलेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण मंजूर झाले आहे. जमीन संपादनाबाबत नुकतेच राजपत्र काढण्यात आलेले होते. रस्ता पूर्वीच्या मार्गाने न करता मुक्ताईनगर तालुक्यातील गावांमधून जाणार असल्याने रावेर तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी होती. तसेच महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने 61 रुपये कोटी निधी मंजूर आहेत. ठेकेदारामार्फत दुरुस्तीचे काम संथगतीने होत आहे.
सध्या तर काम बंद आहे, अश्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यानुसार मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन महामार्ग पूर्वीच्या मार्गानेच करणे, रस्त्याची देखभाल दुरुस्ती असलेल्या ठेकेदारास काम तात्काळ सुरु करणे नाही तर कंत्राटदार बदलविण्याबाबत नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली आहे.
