जळगावातील आयोजित कवितासंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी केले प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
भारतीय साहित्याने आपल्या सामाजिक वास्तवाला दुर्लक्षित न करता साहित्याच्या माध्यमातून जगापुढे आणण्याचा जो प्रयत्न केला त्यात दलित, आंबेडकरी, स्त्री साहित्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कवयित्री ज्योती वाघ-बाविस्कर यांचा ‘ओसंडले शब्दकण’ हा कवितासंग्रह तोच वसा आणि वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. साहित्य हा समाजाचा आरसा आहे, असे प्रतिपादन डॉ.मिलिंद बागुल यांनी केले. सत्यशोधकी साहित्य परिषदेने महाबळ रस्त्यालगतच्या अभियंता भवनात आयोजित कवयित्री ज्योती वाघ-बाविस्कर यांच्या ‘ओसंडले शब्दकण’ कवितासंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कवयित्री माया धुप्पड, गझलकार ज्ञानेश पाटील यांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
‘ओसंडले शब्दकण’ कवितासंग्रहातील कविता आत्मभान जपण्याबरोबरच स्त्रियांच्या मनोभूमिका व्यक्त करणाऱ्या आहेत. वर्षानुवर्षापासून स्त्रियांच्या एकूणच जगण्याच्या दिशा ठरलेल्या होत्या. शिक्षण घेऊन प्रगती साधून त्या लिहू, वाचू लागल्या आणि त्यातूनच नव्या युगाची सुरुवात स्पष्टपणे दिसून येते, कवयित्रीच्या मनातील भावना अनेक स्त्रियांच्या मनांच्या भावनेचे प्रतिनिधी करणारे असेच आहे, असे मत कवयित्री माया धूप्पड यांनी व्यक्त केले.
‘ओसंडले शब्दकण’ हा कवितासंग्रह सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक, वास्तव अनुभूती देणारा कवितासंग्रह असल्याचे गझलकार ज्ञानेश पाटील यांनी सांगितले. आपल्या अनुभवी विश्वाला कवितेच्या माध्यमातून साकारलेले असल्याचे मत कवयित्री ज्योती वाघ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी बुलढाण्याहून आलेल्या विजय कस्तुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. जगदीश पाटील, प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्रा. डॉ. सत्यजित साळवे, उपशिक्षणाधिकारी प्रतिमा सानप, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनीही मनोगते व्यक्त केली.
अनेकांनी केले कवितांचे प्रभावी वाचन
सुरुवातीला कवयित्री ज्योती वाघ-बाविस्कर यांनी कवितासंग्रहाविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर त्यांच्या पुस्तकात समाविष्ट असलेल्या कवितांचे वर्षा पगारे, प्रवीण लोहार, मंजुषा पाठक, शितल पाटील, सुधीर महाजन, अशोक पारधे, आशा साळुंखे, चित्रा पगारे यांनी प्रभावी वाचन केले. विचार मंचावर अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी, गौतम बाविस्कर, अनिता परमार, संध्या महाजन आदी मान्यवरही उपस्थित होते. प्रास्ताविक एस. डी. इव्हेंटचे दिनेश थोरात, सूत्रसंचालन ज्योती राणे तर आभार सुधीर महाजन यांनी मानले.