एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील विठ्ठलपेठ परिसरातील रहिवासी हिरालाल नारायण चौधरी (वय ५२) यांनी शुक्रवारी, १६ मे रोजी रात्री कुसुंबा शिवारातील एका शेतात गळफास घेऊन ‘जीवनयात्रा’ संपविली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
एका खासगी कंपनीत हिरालाल चौधरी हे काम करत होते. ते पत्नी, एक मुलगा व एक मुलीसह विठ्ठलपेठ येथे वास्तव्यास होते. ते १४ मे रोजी घरातून अचानक निघून गेले होते. त्यांनी १५ मे रोजी आपल्या बहिणीला फोन करून, “मी येणार नाही, घरी लक्ष ठेव,” असे सांगितले होते. त्यानंतर कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. १६ मे रोजी रात्री कुसुंबा शिवारातील एका शेतात एका स्थानिक नागरिकाला झाडाला गळफास घेतलेली व्यक्ती आढळली. त्यानंतर तातडीने याची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. चौकशीअंती त्या व्यक्तीची ओळख पटून ते हिरालाल चौधरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केल्याचे सांगण्यात आले.