साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
एका महिला रुग्णावर चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने तिला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे याप्रकरणी डॉ. अनिल शिंदे यांच्यावर भा.दं.वि. कलम ३०४-अ आणि ३२८ प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत येथील न्यायदंडाधिकारी वर्ग -१ यांनी प्रोसेस इश्यू केली आहे.
सविस्तर असे की, पारोळा तालुक्यातील चिखलोड येथील ज्ञानेश्वर राघो पाटील यांनी तक्रार केली आहे की, त्यांची पत्नी अनिता पाटील यांना ९ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. अनिल शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. डॉ. अनिल शिंदे यांनी अनिता पाटील यांच्याकडे दुर्लक्ष केले. कामात निष्काळजीपणा केला. तसेच रुग्णास पुढील उपचारासाठी मुंबई येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्यादरम्यान रुग्णाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. डॉ. शिंदे यांनी वेळीच निर्णय न घेतल्याने अनिता पाटील यांना जास्त दिवस त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करुन ठेवले होते. नातेवाईकांनी अनिता पाटील यांना मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये ५ ऑक्टोंबर, २०२१ रोजी दाखल केले होते. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णाची परिस्थिती सुधारण्यासारखी नाही. त्यांचे शेवटचे तास शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांना घरी घेऊन जा, असे सांगितले. घरी परत येत असताना ६ ऑक्टोंबर २०२१ रोजी नाशिक ते ओझर दरम्यान अखेर अनिता पाटील यांचा मृत्यू झाला.
अनिता पाटील यांच्या मृत्यूस डॉ. अनिल शिंदे कारणीभूत असल्याची तक्रार त्यांचे पती ज्ञानेश्वर पाटील यांनी अमळनेर येथील न्यायदंडाधिकारी वर्ग-१ यांच्याकडे दाखल केली होती. दाखल कागदपत्रे आणि ॲड. सुरेश सोनवणे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन कोर्टाने आरोपी डॉ. अनिल शिंदे यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३०४-अ आणि ३२८ प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत प्रोसेस इश्यू केली आहे.