CEO कॅम्पबेल विल्सनच्या पत्रात सांगितले – मध्यपूर्वेतील संघर्षामुळे केवळ एअर इंडियाच नव्हे, तर संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्रावर परिणाम; इंधन दर दुपटीने वाढले
साईमत / नवी दिल्ली / प्रतिनिधी
इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे एअर इंडियाने गेल्या तीन आठवड्यांत सुमारे २,५०० उड्डाणे रद्द केली आहेत. सध्या या भागातील एअर इंडियाच्या नियमित वेळापत्रकाच्या तुलनेत केवळ ३० टक्के उड्डाणे सुरू असल्याची माहिती CEO कॅम्पबेल विल्सन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे.
विल्सन यांनी नमूद केले की, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे केवळ एअर इंडियाच नव्हे, तर संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्रावर आर्थिक परिणाम होत आहेत. विमान इंधनाचे दर दुपटीने वाढल्यामुळे कंपनीला आपली ७० टक्के उड्डाणे स्थगित करावी लागली आहेत.
वाढत्या खर्चाची भरपाई करण्यासाठी एअर इंडियाने नवीन तिकिटांवर ‘फ्युएल सरचार्ज’ लागू केला आहे. तसेच, ब्रिटन, युरोप आणि उत्तर अमेरिकेला जाणारी विमाने आधीच लांबच्या मार्गाने जात होती, आता आणखी लांबून वळवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे वेळ आणि इंधन खर्च दोन्ही वाढले आहेत.
आर्थिक अनिश्चिततेमुळे प्रवाशांच्या मागणीवरही परिणाम झाला आहे. विल्सन यांनी सांगितले की, प्रत्येक ग्राहक वाढीव भाडे देण्यास तयार नसतो, त्यामुळे भाडे वाढवण्याची मर्यादा कंपनीने ठरवली आहे. तरीही, काही जागतिक एअरलाईन्स क्षमता कमी करत असताना, एअर इंडियाने युरोप आणि उत्तर अमेरिकेतील मागणी लक्षात घेऊन अतिरिक्त उड्डाणे तैनात केली आहेत.
कर्मचाऱ्यांना संबोधित करताना विल्सन म्हणाले की, सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रत्यक्ष प्रभावित क्षेत्रातील कर्मचारी सुरक्षित राहतील यासाठी कंपनी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे.
