साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
गेल्या २०२१ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते. त्यांना कुठलीही शासकीय मदत मिळाली नसल्याने अखेर पीडित शेतकरी प्रांत कार्यालयाबाहेर तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. उपोषणस्थळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांना वाटप करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन देत उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी उपोषण तूर्त मागे घेतले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी दिलीप बाबुराव पाटील आणि मधुकर कौतीक पाटील हे आमरण उपोषणाला बसले होते. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबाही दिला होता.तालुक्यातील अनेक भागात २०२१ मधील खरीप हंगामात अवकाळी तसेच अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाले होते.
तब्बल २७ महिने उलटूनही शासनाकडून कुठलीही दखल घेतली न गेल्याने शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. याबाबत तहसिलदारांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला असून निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले आहे. असे असले तरी याबाबत शासनाने त्वरित दखल न घेतल्यास पुन्हा उपोषण करण्यात येईल, असे दिलीप पाटील यांनी सांगितले.



