एलपीजीच्या तुलनेत ३०–४०% इंधन बचत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय
साईमत / कोपरगाव / प्रतिनिधी
वाढत्या महागाईमुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती व टंचाईने त्रस्त असलेल्या हॉटेल व्यवसायिक, केटरर्स आणि लघुउद्योजकांसाठी कोपरगावमधून दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मवीर शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी उद्योग समूहाने ‘इथेनॉल स्टोव्ह प्रणाली’ विकसित केली असून, ही प्रणाली स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पुढे येत आहे.
ही प्रणाली पारंपारिक एलपीजी गॅसप्रमाणेच कार्य करते, मात्र इंधन म्हणून द्रवरूप इथेनॉल वापरला जातो. टाकीतून इथेनॉल बर्नरपर्यंत पोहोचून ऑक्सिजनसोबत मिसळून निळ्या ज्वालेत जळते, ज्यामुळे स्वयंपाक वेगाने आणि सुरक्षितरीत्या करता येतो. तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार, व्यावसायिक गॅसच्या तुलनेत ३०–४०% खर्चात बचत होऊ शकते.
व्यावसायिक बर्नरची किंमत सुमारे १०,००० ते १५,००० रुपये, तर घरगुती स्टोव्ह ५,००० ते ७,५०० रुपयांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारकडून अनुदान मिळाल्यास या किमती आणखी कमी होऊ शकतात. सध्या हे स्टोव्ह खुल्या बाजारात उपलब्ध नसून, इच्छुकांनी कोल्हे साखर कारखान्याशी संपर्क साधून मागणी नोंदवावी लागते.
कोपरगाव परिसरात इथेनॉल वितरण केंद्रे उभारण्याचे नियोजन असून, व्यावसायिकांना इंधन सहज उपलब्ध होईल. हे स्टोव्ह भारतीय मानक ब्युरो (BIS) ठरवलेल्या निकषांनुसार विकसित केले गेले असून, एलपीजीच्या तुलनेत गळती व स्फोटाचा धोका कमी असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे.
उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा इंधन म्हणून वापर होण्यामुळे शेतकऱ्यांनाही थेट लाभ मिळणार आहे. एकूणच, महागाई आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर ‘इथेनॉल स्टोव्ह’ हा व्यावसायिकांसाठी नवा पर्याय ठरत असून, केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
