नांदातांडाला वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला चार लाखांचा धनादेश

0
11

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते धनादेश सुपूर्द

साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :

तालुक्यातील नांदा येथे वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या तुकाराम मोहन चव्हाण यांच्या वारस ललीताबाई तुकाराम चव्हाण यांना चार लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच सुपूर्द करण्यात आला.

नांदा तांडा येथील शेतकरी तुकाराम मोहन चव्हाण हे घरी पोळा सण करून शेतात गेले होते. शेतातून रात्री ८ वाजेच्या सुमारास ते परत घरी येताना पाऊस सुरू झाल्याने ते वाटेतील एक झाडाखाली थांबले. यावेळी झाडावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीने घटनेचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, या घटनेनंतर अब्दुल सत्तार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला होता. राज्य शासन आपल्या पाठीशी आहे अशा शब्दांत त्यांनी धीर दिला होता. मयताच्या वारसाला शासनाची मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. त्याअनुषंगाने त्यांनी पाठपुरावा करीत मयत तुकाराम चव्हाण यांच्या वारसाला चार लाखांचा शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

यांची होती उपस्थिती

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, सोयगावच्या तहसीलदार मनीषा मेने, नायब तहसीलदार सतीष भदाणे, कृउबा समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण, संचालक नंदकिशोर सहारे, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, नांदातांडा येथील पृथ्वीराज चव्हाण, दारासिंग चव्हाण, युवराज चव्हाण आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here