एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरापासून जवळील रायपूर कुसुंबा येथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात टोकाचा निर्णय घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवारी, २६ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. श्रीकांत मोहन धनगर (वय २१, रा. नवीन रायपूर, ता. जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील रायपूर गावातील श्रीकांत धनगर हा आई-वडील आणि भाऊ जय यांच्यासोबत वास्तव्याला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होता. गुरुवारी, २६ जून रोजी श्रीकांत हा घरी एकटाच होता. त्याचे आई-वडील कामाला गेलेले होते. त्याचा भाऊ हा कामानिमित्त बाहेर होता. त्याने एकटा असताना राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी १२ वाजता त्याचा भाऊ घरी आला. त्यावेळी हा प्रकार उघडकीला आला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी त्याला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर त्याला मयत घोषित केले. मयत श्रीकांतच्या पश्चात आई उज्ज्वला, वडील मोहन धनगर, भाऊ जय असा परिवार आहे.