सुप्रीम कॉलनीवासीयांना फेब्रुवारीपासून अमृत योजनेतून होणार पाणीपुरवठा

0
48

जळगाव ः प्रतिनिधी
गेल्या बर्‍याच वर्षांपासून बाराही महिने पिण्याच्या पाण्यासाठी हेळसांड होणार्‍या सुप्रीम कॉलनीतील रहिवाशांची समस्या लवकरच सुटणार आहे. १५ फेब्रुवारीपासून थेट अमृत अभियानातून नळ संयोजनाद्वारे पाणी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात महापौर भारतीताई सोनवणे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.
सुप्रीम कॉलनीतील जनतेला आजवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.या भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी परिसरात अमृत योजनेंतर्गत पाण्याची टाकी आणि यंत्रणा उभारण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. महापौर सोनवणे यांनी वर्षभरात आढावा घेत कामाला गती देण्याचा प्रयत्न केला.
१ जानेवारीला केलेल्या पाहणीनंतर सोमवारी पुन्हा पाहणी केली. या वेळी पाणीपुरवठा सभापती अमित काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे, अभियंता सुशील साळुंखे, योगेश बोरोले उपस्थित होते.
शहरात प्रथमच अमृतच्या पाण्याचा ‘श्रीगणेशा’
सुप्रीम कॉलनीत आजवर असलेल्या नळ संयोजनातून कधीही सुरळीत आणि नियमित पाणीपुरवठा झालेला नाही.अमृत योजनेंतर्गत नागरिकांना नळ संयोजनाची जोडणी देण्यात येत आहे. सर्व काम पूर्ण झाल्यानंतर जुनी यंत्रणा बंद करून अमृतच्या
पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. अमृतच्या पाण्याचा श्रीगणेशा जळगाव शहरात प्रथमच सुप्रीम कॉलनीत होणार आहे. सर्व काम पूर्ण करून १५ फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीचा मुहूर्त साधून श्रीगणेशा होऊ शकतो अशी शक्यता अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here