जळगाव ः विशेष प्रतिनिधी
माजीमंत्री व राष्ट्रवादीचे जिल्हा नेते गुलाबरावआप्पा देवकर हे आता जळगाव ग्रामीण ऐवजी जळगाव शहर विधानसभा लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.नव्हे तर त्या दृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली असल्याचे बोलले जात आहे.निवडणुकीला अजून जरी चार वर्ष बाकी असली तरी आघाडीची सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे देशाचे मुत्सद्दी नेते शरद पवार हे पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आतापासूनच मोट बांधत असल्याचे समजते. त्यादृष्टीकोणातून गुलाबराव देवकर यांना देखील तसे संकेत पवारांकडून मिळाल्याचे बोलले जात आहे.
गुलाबराव देवकर यांचा वाढदिवस नुकताच थाटात साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम देखील राबविण्यात आले. यावेळी शहारातील पक्षाच्या कार्यकर्त्यांची व प्रेमी जणांची उपस्थिती लक्षणीय होती.तसे पाहता त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात सुरेशदादा जैन यांच्या माध्यमातून शहरातूनच झाली आहे.शहरात त्यांचा दांडगा संपर्क आहे.त्या दृष्टीने हा मतदार संघ त्यांना अधिक सुरक्षित असल्याचे पवारांना वाटत असावे.
सध्या राज्यात आघाडीची सत्ता असल्याने येणारी विधानसभेची निवडणूक आघाडी करूनच लढण्याबाबत आघाडीतील तीनही पक्ष वारंवार सांगत आहेत.त्यामुळे जळगाव ग्रामीण हा मतदार संघ शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांसाठी राखीव ठेवला जाईल यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे तिथे देवकराना उमेदवारी देणे शक्य होणार नाही हे ओळखून कदाचित पवारांनी हा निर्णय घेतला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने जिल्ह्यात सध्या नवचैतन्य निर्माण झाले आहे. खडसे यांची फार मोठी मदत शहरात देवकर यांना होवू शकते हे देखील एक कारण असू शकते.त्यामुळे देवकर हे त्यादृष्टीने शहरात आपली मोट बांधत असल्याचे बोलले जात आहे.विद्यमान आमदार राजू मामा भोळे यांना शहराने दुसर्यांदा संधी दिली. त्याच बरोबर त्यांच्या सौभाग्यवती यांना महापौरपद देखील मिळाले परंतु ते शहराचा कुठलाही विकास करू शकले नाहीत. ते पूर्णतः अपयशी ठरल्याने शहरवासीयांची घोर निराशा झाली आहे.त्यामुळे देवकर यांना भोळे यांच्याबद्दल जळगावकरांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा होवू शकतो तसेच भाजपचे विद्यमान नगरसेवक यांच्यात सर्वच अलबेल आहे असेही नाही.त्यांच्यात देखील मोठ्याप्रमाणात बेबनाव आहे. निवडणुकीपर्यंत बरेच नगरसेवक राष्ट्रवादीत येण्याची देखील शक्यता असल्याचे समजते. त्यामुळे अशी एक ना अनेक समीकरणे समोर असल्याने देवकर यांना शहरातून निवडणूक लढविणे सहज विजय मिळवून देण्यासाठी सोईचे ठरू शकते,हे पवारांनी नक्कीच हेरलं असावे. म्हणून देवकर यांनी त्या दृष्टीने शहरात संपर्क व भेटीगाठी सुरू केल्या असाव्यात असाही कयास बांधला जात आहे. त्यांनी नगररपालिकेत अनेक वर्ष काम केले आहे.ते स्थायी समितीचे माजी सभापतीही आहेत.मजूर फेडरेशनच्या माध्यमातून त्यांचेही अनेकांचा दृढसंबंध निर्माण झाला असल्याने शहरात त्यांचा दांडगा संपर्क तसेच शहराच्या राजकीय परिस्थितीचा गाढा अभ्यास त्यांना असल्याने पवारांचा हा निर्णय नक्कीचं पक्षाच्या दृष्टीने हिताचा ठरेल असे जाणकारांमध्ये बोलले जात आहे.