जळगाव : प्रतिनिधी
देशाच्या सुरक्षेविषयी गोपनीय माहिती मिळत असलेल्या अर्णब गोस्वामी या पत्रकारावर कठोर कारवाई केली पाहिजे. आपण सर्वजण ही मागणी करीत असताना किमान राष्ट्रप्रेमापोटी तरी भाजपने ही मागणी करावी कारण देशहित सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर बोचरी टीका केली.
काल जळगाव जिल्हा दौर्यावर आले असताना आमदार पवार यांनी सायंकाळी ६.३० वाजता येथील आकाशवाणी चौफुलीनजिकच्या पक्ष कार्यालयाला धावती भेट दिली. तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करताना विरोधकांचे डावपेच ओळखले पाहिजे.काही पोस्ट थेट फॉरवर्ड न करता बारकाईने वाचल्या पाहिजे. विरोधकांच्या अफवा पसरवणार्या पोस्टवर योग्य उत्तरे दिली पाहिजे. आपला पक्ष सत्तेत असल्याने सामान्य लोकांना, जनतेला केंद्रबिंदू मानून कामे करा, असा सल्ला पवार यांनी तरुणांना दिला.
याशिवाय पक्षातील स्थानिक पातळीवर असलेले गटतट बाजूला सारून पक्षवाढीसाठी सर्वांनी पुढे यावे. यात तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांनी विशेष काम केल्याचा उल्लेखही पवार यांनी केला. जिल्हा दौर्यावर रस्त्यातील बहुतांश गावांतील लोकांशी आपण संवाद साधला.त्यावेळी त्यांच्यामध्ये विशेष उत्साह असल्याचे ते म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्याक आघाडीचे गफ्फार मलिक, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
ईडीची नोटिस फक्त विरोधकांनाच
भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करताच माजी मंत्री एकनाथराव खडसेंना ईडीने नोटिस बजावली. भाजपच्या लोकांना ईडीची नोटीस येत नाही. ती फक्त विरोधी पक्षातील लोकांनाच येते असा आरोप पवार यांनी पाचोर्यात केला.