जळगाव प्रतिनिधी | महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता मुलाणी म्हणाले की,”देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना आपण ज्या संस्थेत काम करतो, तिच्या प्रगतीमध्ये आपले योगदान किती आहे? हे सर्वांनी स्वतःला विचारले पाहिजे. आजचा भारत वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञान, डिजिटायझेशन, नवीकरणीय ऊर्जा व ग्राहकाभिमुख सेवा यामुळे वीज वितरण क्षेत्रातही मोठे परिवर्तन होत आहे. महावितरणही या परिवर्तनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे.
आज देशात व राज्यात सर्व वीजग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू आहे. हे फक्त स्मार्ट मीटर नाही, तर त्यातून आपल्याला स्मार्ट वर्क करण्याची संधी आहे. स्मार्ट मीटर म्हणजे म्हणजे स्मार्ट डेटा, स्मार्ट विश्लेषण, स्मार्ट कृती व स्मार्ट सेवेचा संगम आहे. स्मार्ट मीटरमुळे आपल्याला विविध प्रकारची माहिती उपलब्ध होत आहे, परंतु आपण या माहितीचा सुयोग्य वापर करून ग्राहक तक्रारी कमी करणे, हानी कमी करणे, चोरी व अनियमितता शोधणे, रोहित्रे व वाहिन्यांची कार्यक्षमता सुधारणे, अचूक ऊर्जा अंकेक्षण करणे आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा देणे ही कामे केली तरच आपला स्मार्टनेस दिसेल. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविणे हे शेवटचे उद्दिष्ट नाही; तर त्याद्वारे मिळणाऱ्या माहितीवर स्मार्ट कृती करणे हे आपले खरे उद्दिष्ट आहे.
आज महावितरण एका महत्त्वाच्या परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे. भविष्यातील आयपीओ/लिस्टिंग आणि कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र कंपनी यासारखे संस्थात्मक बदल आपल्या कामकाजाची दिशा अधिक व्यावसायिक, पारदर्शक व कामगिरीभिमुख करण्याची संधी देतील. यात केवळ कंपनीची रचना बदलणार नसून, पारदर्शकता वाढणार, कामगिरीचे मूल्यमापन कठोरपणे होणार, ग्राहकसेवा अधिक महत्त्वाची होणार आणि प्रत्येक रुपयाचा व प्रत्येक युनिटचा हिशोब अधिक अचूक असणार आहे. त्यामुळे या बदलांची वाट न पाहता सर्व कर्मचाऱ्यांनी आपली कार्यसंस्कृती आजपासूनच बदलली पाहिजे.
कृषी ग्राहकांचे स्वतंत्र व्यवस्थापन किंवा विलगीकरण हा केवळ प्रशाकीय बदल नसून ऊर्जा अंकेक्षण, वाहिनी व्यवस्थापन, वितरण हानीत घट व वीजपुरवठ्याची विश्वासार्हता अधिक प्रभावी करण्याची संधी आहे. कृषी वाहिनीवर योग्य मीटरिंग, अचूक ऊर्जा अंकेक्षण, सौर ऊर्जीकरण, दिवसा वीजपुरवठ्याचे व्यवस्थापन आणि माहितीआधारित नियंत्रण यामुळे वितरण प्रणाली अधिक मजबूत करू शकू.
काम झाल्यानंतर अहवाल देणारी नव्हे, तर माहितीचा वापर करून आधीच कृती करणारी कंपनी अशी ओळख आपल्याला निर्माण करावी लागेल. मी माझ्या क्षेत्रात बदलाची वाट पाहणार नाही; मी स्वतः बदलाची सुरुवात करेन, असा संकल्प आपण स्वातंत्र्य दिनी करूया.
स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर योजनेत (स्मार्ट) आपल्या उपविभागाने पहिले रूफ टॉप सोलर कार्यान्वित केले असेल, तर तो आपल्या परिवर्तनाचा पहिला टप्पा आहे. प्रत्येक विभाग, प्रत्येक उपविभाग व प्रत्येक कर्मचारी याच उत्साहाने पुढे आला, तर संपूर्ण महावितरण ‘स्मार्ट’ होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी संघर्ष केला; आता आपल्या संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण उत्कृष्टतेचा संघर्ष करूया. उत्कृष्टकामगिरी हीच आपली ओळख असू द्या, तंत्रज्ञान आपले साधन असू द्या, ग्राहक सेवा आपले ध्येय असू द्या आणि महावितरणची प्रगती हा आपला संकल्प असू द्या”, असे मुख्य अभियंता मुलाणी म्हणाले.
यावेळी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर योजनेत (स्मार्ट) परिमंडलातील पहिले रूफ टॉप सोलर कार्यान्वित करणाऱ्या भडगाव व पाचोरा-२ उपविभागाच्या अधिकाऱ्यांचा मुख्य अभियंता मुलाणी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
