साईमत / वृत्तसंस्था
हल्दिया येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये सध्या चालू असलेल्या टीएमसी सरकारवर जोरदार टीका केली. मोदींनी म्हटले की, “तृणमूल काँग्रेसने फक्त घुसखोरीचं राजकारण केलं आणि तरुणांचा विश्वासघात केला. व्होट बँक खुश व्हावी म्हणून धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्यावर कोर्टानेही निषेध दर्शवला आहे.”
मोदींनी टीएमसी सरकारचे ‘लांगुलचालन’ आणि घुसखोरांचा खेळ थांबवण्याची गरज असल्याचा स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले, “भाजपाचं सरकार आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला त्याचा हक्क मिळेल; सरकारी नोकऱ्या वेळेनुसार, व्यवहारांमध्ये पारदर्शकता असेल आणि कोणतीही कमिशनखोरी, दलाली राहणार नाही.”
पंतप्रधानांनी मत्स्य पालन क्षेत्रावरही लक्ष वेधले. मोदी म्हणाले की, बंगालमध्ये मासे देशातल्या मागणीनुसार तयार होत नाहीत आणि त्यामुळे बाहेरच्या राज्यांवर अवलंबित्व आहे. “१५ वर्षांमध्ये टीएमसी सरकारने मत्स्य पुरवठा सक्षम केला नाही, तर भाजपाच्या धोरणांमुळे बिहार आणि आसाममध्ये मत्स्य व्यवसाय प्रगती करत आहे,” असे ते म्हणाले.
आयुष्मान भारत योजनेवरही मोदींनी टीका केली. ते म्हणाले, “७० वर्षांवरील रुग्णांना मोफत उपचार मिळणारी योजना टीएमसी सरकार लागू करत नाही, ही दुर्भाग्याची बाब आहे.”
मोदींनी टीएमसी नेत्यांचा तिरस्कार आणि जनतेसाठी केलेल्या धोरणांची तुलना करत सांगितले की, “पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकत्र काम करत असतील तर लोकांचा फायदा होतो. बंगालमध्ये डबल इंजिन सरकार येणे अत्यावश्यक आहे. आम्ही बंगालला आत्मनिर्भर बनवू.”
