मुक्ताईनगरमधील ४१३ घरांचा आणि तिसऱ्या टप्प्यातील २२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला
साईमत /मुक्ताईनगर / प्रतिनिधी
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुक्ताईनगरच्या पुनर्वसनासाठी तब्बल ३८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हा परिसरासाठी विकासातील मोठा टप्पा मानला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुक्ताईनगर येथील पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबीत होता. या कामासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले, ज्याला अखेर आता यश आले आहे. या निधीमुळे मुक्ताईनगरमधील ४१३ घरांचा आणि तिसऱ्या टप्प्यातील २२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
आज मुंबई येथे झालेल्या संयुक्त बैठकीत जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत मतदार संघातील विविध गावांच्या पुनर्वसन कामांसाठी ३८५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली.
या निधीतून मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील भोकरी, पातोंडी, सुलवाडी, कोळोदा, अंतुर्ली, धामणदे, नरवेल, पिंप्री नांदू, बेलसवाडी, मुंडोळदे खडकाचे, मुंढोदे, उचंदा, शेमळदे, मेळसांगवे, पंचाणे, खामखेडा, भामलवाडी, शिंगाडी, मांगलवाडी, कांडवेल, तांदलवाडी, पुरी गोलवाडे, घोडसगाव, चिचखेडा बुद्रुक, आंदलवाडी या गावातील रखडलेल्या नागरी सुविधांना गती मिळणार आहे.
आ. चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कित्येक दशकांपासून प्रलंबीत असलेला प्रश्न मार्गी लागल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये नव्या विकासाची उमेद वाढली असून, लवकरच गावातील पुनर्वसन कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निधी मंजुरीने मुक्ताईनगरसह तालुक्याच्या अनेक गावांना सांभाळलेल्या नागरी सुविधांचा नवविकास आणि पुनर्वसनाच्या योजना त्वरित सुरू होण्याची शक्यता निर्माण केली आहे.
