कोव्हिड काळाप्रमाणे धोरणशून्य कारभार; गरीब आणि प्रवासी मजुरांना स्वयंपाकासाठी सिलिंडरही मिळत नाही
साईमत / नवी दिल्ली
देशभरात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवत असून स्वयंपाकासाठी नागरिकांना सिलिंडर मिळत नाही, अशी गंभीर स्थिती उभी आहे. यावर विरोधक म्हणून सतत आवाज उठवत आहोत, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही पावलं उचलत नसल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एलपीजी तुटवड्याबाबत कुठलंही धोरण नाही. लोकांकडे चूल पेटवायलाही पैसे नाहीत. तरीही पंतप्रधानांचा कारभार कोव्हिड काळातील नीतीशून्य कारभारासारखाच आहे.” एलपीजीच्या तुटवड्यामुळे सर्वाधिक फटका गरीब लोकांना आणि प्रवासी मजुरांना बसला आहे, असेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधींच्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, ५०० ते ८०० रुपयांच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या प्रवासी मजुरांचं जीवन अत्यंत कठीण झाले आहे. स्वयंपाकासाठी सिलिंडर मिळत नसल्यामुळे हे लोक घराकडे परतत असताना चूल पेटवायलाही पैसे उरलेले नसतात. त्यामुळे प्रवासी मजूर शहर सोडून गावाकडे जात आहेत. “जे मजूर फॅक्टरी आणि टेक्स्टाईल मिल्सचा कणा आहेत, ते आज उद्ध्वस्त होत आहेत. उत्पादनात वाढ झाली असताना, ही नवीन संकटं निर्माण झाली आहेत,” अशी टीका राहुल गांधींनी केली.
याशिवाय, महागाई वाढणे, उत्पादन कमी होणे आणि एलपीजी सिलिंडरची टंचाई यामुळे प्रवासी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे, मात्र सरकारने या समस्येकडे लक्ष दिलेले नाही, असेही राहुल गांधींनी म्हटले.
देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून, आता भाजपाकडून राहुल गांधींच्या टीकेला काय उत्तर मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
