साईमत / नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवण्यात आले आहे. राघव यांची जागा पंजाबमधून अशोक मित्तल यांनी घेतली आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, तसेच माजी मुख्यमंत्री व वरिष्ठ नेते आतिशी यांनी यावर टीका केली आहे.
आतिशी म्हणाल्या, “भाजपची पद्धत अशी आहे की, आधी नेत्यांना घाबरवतात, नंतर धमकी देतात आणि काही वेळानंतर आमिष देतात. विरोधी पक्षातील अनेक नेते घाबरून भाजपमध्ये प्रवेश करतात. आता राघव देखील यासाठी तयार असू शकतात.”
आतिशी यांनी पुढे आरोप केला की, “देश सध्या संकटातून जात आहे. लोकशाहीवर हल्ला होतोय. दिल्लीत मतदारांची नावे कमी केली जात आहेत, बोगस मतदान झाले आहे आणि प्रशासनाचा गैरवापर झाला आहे. पश्चिम बंगालमध्येही मतचोरी केली जात आहे. टीएमसी मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणते, तेव्हा राघव सही करण्यास नकार देतात. एलपीजी संकटात जनता रांगेत उभी असते, तर काही जण काळ्या बाजारातून सिलिंडर खरेदी करतात. पक्षाने आवाज उठवायला सांगितला, पण राघव नकार देतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ते भाजप आणि पंतप्रधान मोदी यांना घाबरले आहेत.”
राजकीय विश्लेषकांच्या मते, राघव चढ्ढा यांचे पुढील राजकीय पाऊल भाजपमध्ये प्रवेशाच्या दिशेने जाऊ शकते, ज्यामुळे दिल्लीसह देशभरात राजकीय वर्तुळात चर्चेचा गदारोळ निर्माण होऊ शकतो.
