भोर तालुक्यात दोन भीषण अपघात, नागपूर महामार्ग ‘हॉटस्पॉट’ ठरतोय; प्रशासनाच्या उपाययोजनेची मागणी
साईमत / पुणे
राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांच्या घटनांनी पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. पुणे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत.
भोर तालुक्यातील संगमनेर गाव हद्दीत भरधाव कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील राजेश दशरथ राठोड (वय 21, रा. कोथरूड, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. प्राथमिक माहिती नुसार, भोरकडे येताना तीव्र वळणावर अंदाज न आल्यामुळे हा अपघात घडला. स्थानिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. राजगड पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच दिवशी पुण्यात दुसरा अपघात झाला, जिथे भोर-महाड मार्गावरील शिरगाव परिसरात टेम्पो सुमारे २० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात टेम्पोमधील ९ जण जखमी झाले, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही गाडी गावातील १५ ते २० नागरिक नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी महाडकडे नेत असताना अपघाताचा शिकार झाली. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. भोर पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील काटोल-वरुड सिमेंट महामार्गावर मोठ्या भेगांमुळे हा रस्ता अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ ठरत आहे. गेल्या १० दिवसांत येथे दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. १९ मार्च रोजी महेश धोटे यांचा, तर २७ मार्च रोजी प्रतीक पांडुरंग निकोसे (रा. जलालखेडा) यांचा मृत्यू झाला. मागील एक वर्षात या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे.
स्थानिकांचे म्हणणे आहे की, रस्त्यांची दुरवस्था, वेगमर्यादा न पाळणे आणि निष्काळजीपणा यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती आणि सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सतत केली जात आहे.
