नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावर राज्य सरकारची कठोर कारवाई
साईमत नाशिक प्रतिनिधी
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून, दोषींवर नक्कीच कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले.
अशोक खरात याने दैवी शक्ती असल्याचा दावा करत अनेक महिलांची फसवणूक करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप समोर आले आहेत. या प्रकरणामुळे राज्यभर संताप व्यक्त होत असून, सरकारने तपासाला गती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मुख्य आरोपीला कोणत्याही परिस्थितीत वाचवले जाणार नाही.”
ते पुढे म्हणाले की, सामाजिक दबावामुळे अनेक पीडित महिला पुढे येण्यास घाबरत आहेत. मात्र, त्यांना धीर देऊन आणि विश्वासात घेऊन पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही महिला आधीच तपासासाठी पुढे आल्या असून तपास वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी राज्य पोलीस महासंचालकांना स्वतः लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले असून विशेष तपास पथक (SIT) कार्यरत करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांना कोणतीही सूट मिळणार नाही. काहीजण संवेदनशील प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करत त्यांनी विरोधकांना इशारा दिला, “ज्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत त्यांनी ते पुढे आणावेत; विनाकारण आरोप करू नयेत.”
सध्या नाशिक पोलीस आयुक्त आणि SIT च्या माध्यमातून सखोल तपास सुरू आहे. सरकारच्या माहितीनुसार, या प्रकरणातील प्रत्येक आरोपीपर्यंत पोहोचून कठोर कारवाई केली जाईल, आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याची पूर्ण हमी सरकारकडून दिली आहे.
