ट्रॅक्टर आणि मालमोटारची धडके; रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना सुरू
साईमत / नाशिक / प्रतिनिधी
मनमाड ते नांदगाव रस्त्यावरील जोंधळवाडी परिसरात ९ मार्च रोजी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ट्रॅक्टरचा टायर पंक्चर झाल्यामुळे चालक आणि इतर काही जण रस्त्याच्या कडेला टायर बदलत असताना नांदगावकडून येणाऱ्या भरधाव मालमोटारीने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरचे तीन तुकडे होऊन रस्त्याच्या कडेला फेकले गेले.
या धडकेत ट्रॅक्टरजवळ उभे असलेले सचिन राजनोर (रा. कानडगाव) आणि नितीन डगळे (रा. जोंधळवाडी) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मालमोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाचे निर्णय
मनमाड-नांदगाव मार्गावर इंधन कंपन्यांमुळे अवजड वाहतुकीत वाढ झाली आहे. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे.
मंत्र्यांच्या सूचनेनुसार, येवला-मनमाड-मालेगाव मार्गावर अवजड वाहतूक २४ मार्चपासून रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत सुरू राहील; दिवसाच्या वेळेत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरकडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक इतर मार्गांवर वळविण्याचे आदेश दिले आहेत.
