ग्रामस्थांचे आवाहन वन विभागाने तातडीने पिंजरा लावा
साईमत/नंदुरबार/तळोदा / प्रतिनिधी
तळोदा शहराच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा पुन्हा एकदा वावर वाढल्याचे समोर आले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अलीकडील घटनेत एका प्राण्याचा बळी गेल्यामुळे शेतकरी आणि स्थानिक रहिवासी चिंतेत आहेत.
१६ मार्च २०२३ रोजी, सोमवारी रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास, शेतकरी राजेश तुकाराम सूर्यवंशी यांच्या शेतालगत असलेल्या आमराईत झोपडीत बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात एका शेळीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्यावर बिबट्या तेथून पळून गेला, मात्र काही वेळानंतर तो पुन्हा त्या ठिकाणी दिसून आला. स्थानिकांनी सतर्कता दाखवत आवाज करून त्याला दूर पळवून लावले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बिबट्या दोराला अडकलेल्या शेळीवर ताव मारत असल्याचे दृश्य पाहून परिसरातील भीती वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वन विभाग आणि प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, तसेच लोकवस्तीच्या जवळ त्याचा वाढता वावर लक्षात घेता, लहान मुले, महिला आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.
वनविभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः रात्री एकटे बाहेर न जाणे, पाळीव प्राण्यांची सुरक्षित व्यवस्था करणे आणि बिबट्याचा कोणताही मागोवा आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.
या घटनेनंतर तळोदा शहराच्या आजूबाजूच्या भागात नागरिकांची सतर्कता वाढली असून, बिबट्याच्या वावरावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
