अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईने अन्य दुकानांचे रक्षण
साईमत/सावदा/ प्रतिनिधी –
सावदा शहरातील बसस्थानक परिसरात शुक्रवार (दि. १३ मार्च २०२६) दुपारी ‘भारत गादी भंडार’ या गाद्यांच्या दुकानाला अचानक आग लागून मोठा आर्थिक फटका बसला. या भीषण आगीत दुकानातील गाद्या आणि इतर साहित्य जळून खाक झाले असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानकाजवळील एस. के. रेडियम दुकानाच्या शेजारी असलेल्या भारत गादी भंडारातून धूर आणि ज्वाळा बाहेर येताना दिसल्याने नागरिकांत खळबळ उडाली. घटना दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान घडली. काही नागरिकांनी तत्काळ सावदा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती दिली.
घटनास्थळी आग लागल्याची त्वरित माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशामक दल दाखल झाले. अग्निशामक जवानांनी धडपड करत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. वेळेवर कारवाई केल्यामुळे आग इतर शेजारील दुकानांपर्यंत पसरण्यापासून रोखता आली.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानातील मोठ्या प्रमाणावर गाद्या आणि साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे दुकानदाराला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागले. घटनास्थळी नागरिकांची गर्दीही मोठ्या प्रमाणावर झाली होती.
सध्या आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक तपासानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संबंधित यंत्रणेकडून पुढील चौकशी सुरू असून नुकसानाचे पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेने सावदा शहरातील बाजारपेठेत तात्पुरती खळबळ उडवली असली तरी वेळेवर आग विझविण्यामुळे मोठा मोठा अपघात टळल्याचे मानले जात आहे.
