सावकाराच्या तगाद्याला कंटाळून हातमजूर तरुणाचे टोकाचे पाऊल
साईमत/चोपडा/प्रतिनिधी
चोपडा शहरात अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. योगेश सुनील चौधरी (वय अंदाजे २५) असे मृत तरुणाचे नाव असून, केवळ १० हजार रुपयांच्या कर्जापोटी तब्बल २ लाख रुपये व्याज भरूनही सावकाराचा छळ न थांबल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
२५ तारखेला सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास योगेशने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
१० हजारांच्या बदल्यात २ लाखांची वसुली
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याने ‘पिंटू’ नामक व्यक्तीकडून १० हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, या अल्प रकमेच्या बदल्यात सावकाराने वेळोवेळी प्रचंड व्याज आकारत आतापर्यंत सुमारे २ लाख रुपये वसूल केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
इतके पैसे देऊनही सावकाराची मागणी थांबली नाही. तो वारंवार अधिक पैशांसाठी तगादा लावत होता. या सततच्या आर्थिक दडपणामुळे योगेश मानसिकदृष्ट्या खचला होता, अशी माहिती त्याच्या जवळच्या व्यक्तींनी दिली.
मृत्यूपूर्वी चिठ्ठीत मांडली व्यथा
घटनेनंतर योगेशच्या खिशात एक सुसाईड नोट आढळून आली. या पत्रात त्याने सावकार पिंटू याच्या छळाची सविस्तर माहिती दिली आहे. केवळ पैशांसाठी तगादा नव्हे, तर त्याच्यावर मारहाण करण्यात आली होती. इतकेच नव्हे, तर त्याच्या वृद्ध आई-वडिलांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याचे त्याने नमूद केले आहे.
सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत स्पष्ट केले आहे. “पिंटूला कडक शिक्षा व्हावी,” अशी आर्त मागणीही त्याने आपल्या शेवटच्या पत्रात केली आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
योगेशच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. संपूर्ण कुटुंब मोलमजुरी करून गुजराण करत असून, कष्टाळू मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, संबंधित सावकाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक व नागरिकांकडून होत आहे. अवैध सावकारीच्या वाढत्या प्रकारांवर प्रशासनाने वेळीच लगाम घालावा, अन्यथा अशा घटना पुन्हा घडू शकतात, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
