साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव, दि. १९ जानेवारी २०२६ – जळगाव लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना मोठा धक्का मिळाला आहे. खासदार स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर केंद्र शासनाने गिरणा नदीवरील नवीन बांभोरी पुलाच्या उभारणीसाठी ७९ कोटी २३ लाख ३९ हजार ६४८ रुपये मंजूर केले आहेत.
हा पूल नॅशनल हायवेवर येणार असून, वाढत्या वाहतुकीच्या ओझ्यामुळे निर्माण होणाऱ्या कोंडीची समस्या कमी करण्यासाठी अत्याधुनिक PSC Girder (Pre-Stressed Concrete Girder) तंत्रज्ञान वापरून बांधला जाणार आहे. नवीन पूलामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होईल तसेच जळगावचा चेहरामोहरा बदलून राहील, असा विश्वास स्थानिक आणि अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
स्मिताताई वाघ म्हणाल्या, “जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने हा पूल उभारणे हे मतदारसंघासाठी एक मैलाचा दगड ठरेल. पारदर्शक प्रक्रिया आणि दर्जेदार कामाद्वारे आम्ही जळगावला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेऊ.”
या प्रकल्पाबरोबरच गिरणा नदीवरील जुन्या पुलाची विशेष दुरुस्ती व मजबुतीकरण, तसेच कालिंका माता ते खोटे नगर रस्त्याचे White Topping पद्धतीने काँक्रिटीकरण आणि RCC गटार बांधकाम यांसारखी इतर महत्त्वाची कामेही सुरू होतील. या सर्व सुधारणांमुळे जळगावकरांना सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी प्रवास उपलब्ध होईल, तसेच शहरातील दैनंदिन वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन आर्थिक प्रगतीला चालना मिळेल.
या संदर्भात स्मिताताई वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.
