तुंबलेल्या गटारांमुळे दलीत वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
साईमत /बोदवड/प्रतिनिधी
शिरसाळा ग्रामपंचायतीच्या निष्काळजी, मनमानी व उदासीन कारभारामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य अक्षरशः राम भरोसे असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. दलीत वस्ती परिसरातील गटारे अनेक दिवसांपासून तुंबलेल्या अवस्थेत असून सांडपाणी रस्त्यावर साचल्याने संपूर्ण परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
दलीत वस्तीतील परिस्थिती अत्यंत विदारक
दलीत वस्ती भागातील गटारे पूर्णपणे घाण पाण्याने भरून वाहत असून सांडपाणी थेट रस्त्यावर पसरले आहे. परिणामी नागरिकांना ये-जा करणेही कठीण झाले आहे. घरासमोरच साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून लहान मुले, वृद्ध नागरिक व महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या भागातील सार्वजनिक तसेच वैयक्तिक शौचालयांची स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. गटारे तुंबल्याने शौचालयात पाणी साचत असून स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव दिसून येत आहे. यामुळे महिलांना व मुलांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
साथीच्या आजारांचा धोका वाढला
गटारे साफ न केल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली असून मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच त्वचारोग, पोटाचे विकार यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. अनेक नागरिकांना ताप, अंगदुखी, त्वचारोगाची लक्षणे जाणवत असून आरोग्य यंत्रणेकडून मात्र कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत.
संपूर्ण गावातच गटारांची दयनीय अवस्था
ही समस्या केवळ दलीत वस्तीपुरती मर्यादित नसून शिरसाळा गावातील इतर भागांमध्येही गटारांची अवस्था तितकीच बिकट आहे. अनेक ठिकाणी गटारे महिनोन्महिने साफ करण्यात आलेली नाहीत. पावसाळ्यापूर्वी करावयाची स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजना ग्रामपंचायतीकडून करण्यात आल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
तक्रारी करूनही कारवाई शून्य
स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय तसेच ग्रामसेवकांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ग्रामसेवकांचा मनमानी व निष्काळजी कारभार पुन्हा एकदा उघडकीस आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. आरोग्य विभागानेही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल
या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संबंधित ग्रामसेवक व ग्रामपंचायतीने तात्काळ हस्तक्षेप करून संपूर्ण गावातील गटारी स्वच्छ कराव्यात, साचलेले सांडपाणी हटवावे तसेच फवारणी करून डासांचा प्रादुर्भाव रोखावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
भविष्यात अशा प्रकारची आरोग्याला घातक परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी, नियोजनबद्ध उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वेळेत कारवाई न झाल्यास ग्रामपंचायतीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
