
सार्वजनिक बांधकाम विभागाचे झोपेचे सोंग; नागरिकांचा आरोप
साईमत/पहूर, ता.जामनेर /प्रतिनिधी :
पहूर-शेंदुर्णी मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ अवघ्या वर्षभरातच मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या या मार्गावर खड्ड्यांमुळे वाहनचालकांची तारेवरची कसरत होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचा वापर झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “वर्षभरही न टिकणारा रस्ता म्हणजे जनतेच्या पैशांचा सरळसरळ अपव्यय”, असा संताप वाहनचालकांनी व्यक्त केला. खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीच ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. स्थानिकांचा आरोप आहे की, विभाग तात्पुरती डांबरफेक करून वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे खड्डे काही दिवसांनी पुन्हा उघड्या दातांनी दिसू लागतात. अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की वाहनचालकांना
अक्षरशः रस्त्यामधून मार्ग काढणे कठीण झाले आहे.
दरम्यान, या मार्गावर नुकत्याच मोऱ्या (ड्रेनेज) बांधण्यात आल्या असल्या तरी ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे त्या परिसरात वाहतुकीला मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत संबंधित अभियंते व ठेकेदारांवर तातडीने कार्यवाही करून रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.


