आणीबाणीत कारावास झालेल्या बंदिवानांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव
साईमत/नंदुरबार/प्रतिनिधी :
आणीबाणीच्या कालखंडात जिल्ह्यातील ज्या गौरवमुर्तींना कारावास भोगावा लागला. त्यांच्या संघर्ष आणि लढ्यामुळे लोकशाही बळकट झाली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले. त्या बुधवारी, २५ जून रोजी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित आणीबाणीच्या काळात कारावास भोगावा लागलेल्या बंदिवानांच्या गौरव समारंभ आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी महेश चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, महसूल तहसिलदार जगदीश भरकट, निवासी नायब तहसीलदार (महसूल) रिनेश गावित, उदेसिंग पाडवी, लक्ष्मण कदम, भगवानदास अग्रवाल, नजुबाई गावित, प्रसन्नकुमार बारगळ, वाहरु सोनवणे, इंद्रपालसिंह राणा, हरचंद कोळी आदी उपस्थित होते.
यावेळी गौरवमूर्ती उदेसिंग पाडवी, लक्ष्मण कदम, भगवानदास अग्रवाल, नजुबाई गावित, प्रसन्नकुमार बारगळ, वाहरु सोनवणे, इंद्रपालसिंह राणा, व हरचंद कोळी तसेच वारस देवकाबाई सोनार, मालतीबाई ठाकुर, कमाबाई कुंभार, कलाबाई चौधरी, केवलबाई पाटील, यमुनाबाई चौधरी, शांतीबेन अग्रवाल, मिराबाई पाटील, कमलाबाई चौधरी, शोभा पाठक, निर्मला पाटील, संतोषराणी शर्मा आदी उपस्थित होते.
आजचा गौरवाचा क्षण अविस्मरणीय
आणीबाणीच्या दिवसात आमचे कुटुंब, घरदार सर्वकाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. वेगवेगळ्या जेलमधून आम्हाला स्थानबद्ध केले जात होते. आज ते अंगावर शहारे आणणाऱ्या क्षणांना उजाळा देत असताना आजचा गौरवाचा क्षण आम्हा आणीबाणीग्रस्तांच्या जीवनात अविस्मरणीय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये हा सन्मान लाभला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानत असल्याचे आणीबाणीत कारावास भोगलेले तथा माजी आमदार उदेसिंह पाडवी यांनी मनोगतातून सांगितले.
लोकशाहीच्या संरक्षणासाठी आजही तयार
आणीबाणीच्या काळ्याकुट्ट आठवणींना आज ५० वर्षे झाली आहेत. लोकशाहीची गळचेपी होताना त्यावेळी आम्ही लढलो आणि आजही लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढायची तयारी आहे. शासनाने आणीबाणीच्या कारावास भोगलेल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ केली आहे आणि सन्मानपत्र देवून यथोचित गौरव केला. त्याबद्दल शासनाचे आभार मानत साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी भविष्यात मानधनाच्या तफावतींबद्दल मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली.
स्वातंत्र्य अन् लोकशाहीसाठी आमचा लढा
देशाला स्वातंत्र्य मिळाले, लोकशाही प्रस्थापित झाली तरीही आपल्या मुलभूत अधिकारांपासून जनता वंचित होती. त्यासाठी आमचा लढा सुरू होता. या लढ्याला चिरडून टाकण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. अक्षरशः माझ्या लहान मुलाचे उदर-भरण, संगोपन करत असताना मला अटक केली. परंतु सत्यासाठी आणि लोकशाहीच्या हक्कांसाठी आमचा लढा आम्ही कायम ठेवला आणि ते भविष्यातही कायम राहिल, असे सांगत सरकारने ५० वर्षांनी आम्हाला गौरवित केले. त्याबद्दल ज्येष्ठ कादंबरीकार नजूबाई गावित यांनी मनोगत व्यक्त केले.
‘भारत माता की जय’ म्हणणे गुन्हा ठरवला गेला
आणीबाणीमुक्त देश झालाच पाहिजे, देशात लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे. त्यासाठी ‘भारत माता की जय’ यासारख्या घोषणा दिल्या. म्हणून तडकाफडकी अटक करण्यात आली. कुटुंबियांची कोंडी केली गेली. त्यांच्याशी कुणी संपर्क करत नव्हते. त्यांच्याशी संपर्क करणाऱ्यांवर पाळत ठेवून गुन्हा दाखल केला जात होता. आज मात्र राज्य शासनाने सर्व आठवणींना उजाळा देताना सर्व आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना जो गौरव केला, तो निश्चितच शब्दांपलीकडचा असल्याचे मनोगत लक्ष्मण कदम यांनी व्यक्त केले.
चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
यावेळी जिल्हा प्रशासनाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या समन्वयाने निर्माण केलेल्या आणीबाणीतील गौरवमूर्ती चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. अवघ्या दीड दिवसात तयार केलेल्या प्रदर्शनातून नंदुरबार जिल्ह्यात आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या ३९ बंदिजनांवर सचित्र माहिती देण्यात आली.
‘आणीबाणीतील गौरवमूर्ती’ डिजिटल पुस्तिकेचे प्रकाशन
कार्यक्रमात आणीबाणीतील ज्या गौरवमुर्तींना कारावास भोगावा लागला त्यांच्याबद्दलची संक्षिप्त माहिती असलेल्या डिजिटल पुस्तिकेचेही प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे दिनेश चौरे, रवींद्र शिंदे, विकास नाठे, चंद्रकांत अहिरे, जिल्हाधिकारी कार्यालयातील (गृहशाखेचे) शरद जाधव, संदीप शिंदे, प्रतीक वळवी आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन भूसंपादन शाखेचे मंडळ अधिकारी जितेंद्र नांद्रे यांनी केले.