Ringangaon Child Murder Case : रिंगणगावातील मुलाचा खुन प्रकरण : ३६ तासात एलसीबीकडून दोन संशयित आरोपींना अटक

0
16

धक्का लागल्याच्या कारणावरुन केला मुलाचा खून, तिसरा साथीदार फरार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी:

एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे १४ वर्षीय तेजस गजानन महाजन ह्याचा खून करून पळून गेलेल्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केवळ ३६ तासात ताब्यात घेतले आहे. सोमवारी, १६ जून रोजी तेजसच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह गळ्यावर धारदार शस्त्राने वार केलेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी ग्रामस्थांनी रास्ता रोको करत तातडीने तपास करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिल्यानंतर दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, त्यांचा तिसरा साथीदार फरार असून त्याचाही मागोवा पोलिसांकडून सुरु असल्याचे सांगण्यात आले.

सविस्तर असे की, एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील गजानन नामदेव महाजन (वय ४५) यांनी १६ जून रोजी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यांचा १४ वर्षांचा मुलगा तेजसला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरातून पळवून नेले आहे. अशा तक्रारीवरून एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी तातडीने शोध मोहीम राबवली. गावाबाहेरील रिंगणगाव-खर्चे रस्त्यालगतच्या पडक्या शेतात एका काटेरी झुडपात तेजसचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची पाहणी केल्यावर त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. अशा घटनेमुळे ग्रामस्थांनी रास्ता रोको करून तातडीने आरोपींना शोधण्याची मागणी केली होती. आरोपींनी खुन केल्याचा कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. त्यांना कोणीही पाहिले नसल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी तात्काळ भेट देऊन एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना आरोपी शोधाबाबत मार्गदर्शन केले. एरंडोल पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तेजस सायंकाळी कुठे आणि कोणासोबत गेला? त्याचा शोध सुरू केला. १६ जून रोजी रिंगणगावात सायंकाळी ५ वाजेपासून बाजार असल्याने सायंकाळी ७ वाजता तेजस हा खर्चे रस्त्याकडे जाताना दिसला होता. त्या माहितीवरून बाजारात फिरणाऱ्या सर्व संशयितांची चौकशी केली. मात्र, काहीही पोलिसांना काहीही माहिती मिळू शकली नाही.

मध्यप्रदेशातून दोघा संशयितांना अटक

पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या पथकाने तेजसचा मृतदेह सापडलेल्या शेतात जाऊन पुन्हा तपास केला. मृतदेहापासून ५० फूट अंतरावर राहणाऱ्या मध्यप्रदेशातील खरगोन परिसरातून शेतीकामासाठी आलेल्या काही कुटुंबांकडे चौकशी सुरू केली. चौकशीअंती त्यांना माहिती मिळाली की, तेथे राहणारे हरदास वास्कले (रा. नांदीया, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) हा पत्नी समिता आणि मुलांसोबत तसेच त्याच्या बाजूला राहणारा सुरेश खरते (रा. धोपा, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) हे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी सकाळीच मोटारसायकलवरून रवाना झाले होते. पेरणीचे दिवस असताना मालकांना न सांगता हे संशयित निघून गेल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला.

नाकाबंदीमुळे मिळाले पथकाला यश

पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके रवाना केली. पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस असलेले पो.काँ. गौरव पाटील यांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषणाद्वारे हरदास वास्कले हा फैजपूर-रावेर मार्गे जात असल्याचे दिसून आले. पोलीस अधीक्षकांनी तात्काळ फैजपूर आणि रावेर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावर्ती भागात नाकाबंदीचे आदेश दिले. त्यानुसार स.पो.नि. श्री. मोताळे (फैजपूर) यांनी भुसावळ-फैजपूर येथे नाकाबंदी लावली. नाकाबंदीवेळी संशयित हरदास वास्कले मोटारसायकलवर येताना दिसला. त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह पो.ना. श्रीकृष्ण देशमुख, स.फौ.रवी नरवाडे, पो.हवा. संदीप चव्हाण, गोपाल गव्हाळे, यशवंत टहाकळे, पो.काँ. बबन पाटील, प्रदीप सपकाळे, प्रियंका कोळी, चा.पो.हवा. महेश सोमवंशी यांनी ताब्यात घेतलेल्या हरदास वास्कलेची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, त्याच्या शेजारी राहणारा सुरेश खरते आणि गावातील रिचडीया कटोले हे गावात फिरत असताना समोरून येणाऱ्या तेजस महाजनला सुरेश वास्कलेचा धक्का लागला. त्यावरून सुरेशने तेजसला शिवीगाळ करून मारहाण केली. तेजसने त्यांना विरोध करताच तिघांनी त्याला मारहाण केली. रिचडीयाने त्याच्याकडील चाकूने तेजसच्या गळ्यावर वार करून त्याला गंभीर जखमी करून ठार केले. त्यांनी कोणीही पाहिले नसल्याचे पाहून तेजसला उचलून सुरेशने खांद्यावर नेले. आडमार्गाने त्यांच्या झोपड्यांच्या बाजूला असलेल्या शेतात काटेरी झुडपात लपवून ठेवले.

दोघांना दिले एरंडोल पोलिसांच्या ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम याकुब, हरिलाल पाटील, विजय पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील, विष्णू बिऱ्हाडे, संदीप पाटील, प्रवीण मांडूळे, राहुल कोळी, किशोर पाटील, पो.काँ. प्रदीप चवरे, विलेश सोनवणे, पो.ह.वा. दामोदरे, रवींद्र पाटील यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी सुरेश खरते (रा. धोपा, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) याचा तपास काढत त्याला धोपा, ता. झिरण्या, जि. खरगोन येथून डोंगरवस्तीतून भंगारघाटी धोपा गावी जवळपास १० कि.मी. पायी जाऊन ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींची एकत्रित चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचा तिसरा साथीदार रिचडीया कटोले याच्या शोधार्थ सहा.पो.नि. डोमाळे आणि कर्मचाऱ्यांचे पथक रवाना झाले आहे. ताब्यात घेतलेल्या दोघा संशयित आरोपींना एरंडोल पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड आणि स्टाफ करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here