In Nandurbar District : नंदुरबार जिल्ह्यातही न.पा.सह जि.प.निवडणुकांचेही पडघम वाजू लागले

0
11

जि.प.च्या गटांसह गणांच्या रचनेचीही तयारी, १६ जुलैला अधिसूचना तर १८ ऑगस्टला अंतिम रचना जाहीर होणार

साईमत/नंदुरबार/प्रतिनिधी :

येथील नगरपालिकांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांचेही पडघम वाजू लागले आहेत. १४ जुलै प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंतिम प्रभाग रचना ही १८ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. सध्या असलेल्या ५६ गट आणि ११२ गणांच्या संख्येत कुठलाही बदल होणार नसल्याचे राज्य शासनाच्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे पूर्वीच्याच पद्धतीने गट व गणांच्या निवडणुका होतील हे स्पष्ट आहे. दरम्यान, नगर पालिका आणि जिल्हा परिषदांचा निवडणुकांसाठीची प्रक्रिया सुरू झाल्याने आधी पालिका की जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, याबाबत उत्सुकता लागून राहणार आहे.

नंदुरबार येथील जिल्हा परिषदेची मुदत जानेवारी महिन्यात संपली होती. त्यावेळपासून मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत. निवडणुका कधी जाहीर होतील, याबाबत उत्सुकता असताना आता राज्य शासनाने निवडणुकीसाठीची पूर्वतयारी म्हणून गट व गणांची रचना करण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. त्यामुळे येत्या चार महिन्यात निवडणुका होतील, असे गृहीत धरले जात आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनांचा कार्यक्रम एकाचवेळी जाहीर झाल्याने आधी कुठल्या निवडणुका होतील, याबाबत आता उत्सुकता ताणली गेली आहे. सर्वांच्या नजरा आता त्याकडे लागून आहेत.

गट, गण रचनेचा कार्यक्रम असा राहील

शासनाच्या आदेशानुसार १६ जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जिल्हाधिकारी जाहीर करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या प्रभाग, गट व गण रचनांवर हरकती घेणे व सूचना मांडण्यासाठी २१ जुलैची मुदत राहणार आहे. प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख ही २८ जुलै आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी ११ ऑगस्ट रोजी घेऊन निर्णय दिला जाणार आहे. अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी १८ ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे.

गट वाढण्याची शक्यता ठरली ‘फोल’

२०११ ची लोकसंख्या गृहीत धरूनच गट व गण रचना राहणार आहे. शिवाय त्यांच्या संख्येतही बदल होणार नसल्याने आधी गृहीत धरण्यात आलेली गट वाढण्याची शक्यता आता फोल ठरली आहे. शहादा व नंदुरबार तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढेल, अशी शक्यता गृहीत धरण्यात आली होती. परंतु २०११ नंतर वाढलेल्या लोकसंख्येला गृहीत धरण्यात आलेले नाही. त्यामुळे ५६ गट व ११२ गण कायम राहतील हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गट वाढण्याची असलेली शक्यता आता फोल ठरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना गेल्या वेळेचा निवडणुकीचा अनुभव कामी येणार आहे. त्यानुसार निवडणुकीची रणनिती आखण्यास मदत होणार आहे.

तालुकानिहाय लोकसंख्येसह असे आहेत गट, गण

२०११ च्या जनगणनेनुसार तालुकानिहाय लोकसंख्या, गट आणि गणांची संख्या अशी आहे. त्यात अक्कलकुवा तालुक्याची लोकसंख्या २ लाख ४५ हजार ८६१ आहे. त्यात एससी लोकसंख्या १ हजार ७५५ तर एसटी लोकसंख्या २ लाख ९ हजार ५८६ आहे. त्यात १० गट तर २० गण आहेत. धडगाव तालुक्याची लोकसंख्या १ लाख ८३ हजार ८४६ आहे. एससी १ हजार १६३, एसटी १ लाख ८० हजार १६३ आहे. ७ गट तर १४ गण आहेत. तळोदा तालुक्याची १ लाख ३० हजार ७०० लोकसंख्या आहे. एससी १ हजार ९७७, एसटी १ लाख १४ हजार ६९६ आहे. ५ गट तर १० गण आहेत. शहादा तालुक्यात ३ लाख ४६ हजार ३५२ लोकसंख्या आहे. एससी १६ हजार २०३ तर एसटी २ लाख १३ हजार २०३ आहे. त्यात १४ गट तर २८ गण आहेत. नंदुरबार तालुक्याची लोकसंख्या २ लाख ५६ हजार ४०९ आहे. एससी ८ हजार ५४४ तर एसटी १ लाख ५३ हजार ७७४ आहे. १० गट तर २० गण आहेत. नवापूर तालुक्याची लोकसंख्या २ लाख ३७ हजार ६४५ आहे. एससी लोकसंख्या १ हजार ८६३ तर एसटी दोन लाख २३ हजार ६७१ आहे. त्यात १० गट तर २० गण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here