नागपूरमध्ये १० व्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन
नागपूर (प्रतिनिधी)-
शहरात २६ व २७ एप्रिलरोजी मातोश्री विमलताई देशमुख सभागृह, धनवटे नॅशनल कॉलेज येथे १० वे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन वैचारिक वातावरणात रंगणार आहे. “शाश्वत मूल्यांच्या संवर्धनार्थ” या उद्घोषणेसह होणाऱ्या या संमेलनात देशभरातील साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक, पत्रकार आणि कवी सहभागी होणार आहेत.
संमेलनाचे अध्यक्षपद माजी कुलगुरू आणि एमआयटी पुणेचे सल्लागार डॉ. एस. एन. पठाण भूषवणार आहेत. उद्घाटन सत्रात प्रा. डॉ. अनुपमा उजगरे (मुंबई) यांचे विशेष भाषण होणार असून त्या मराठीतील मुस्लीम साहित्यप्रवाहाबद्दल विचार मांडतील. स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. शरयू तायवाडे, मुख्य आमंत्रक प्रा. जावेद पाशा कुरेशी, सचिव अय्युब नल्लामंदू आणि संयोजन समिती पदाधिकारी आयोजन करत आहेत.
पहिल्या दिवशी उद्घाटनसत्रात विविध पुस्तकांचे प्रकाशन होणार असून त्यात “मन्हाठवाणी” स्मरणिका, “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज”, “हिंदुत्व आणि धर्मांतरित मुस्लीम पुढील आव्हाने”, “कासिद” विशेषांक, “सावी” बाल कादंबरी, “ती मशिद”, “आम्ही जिहादी”, “शब्द सारथी”, आणि “उतार वयातील चढण” या साहित्यकृतींचा समावेश असेल.
दुपारी ‘मध्ययुगीन मुस्लीम मराठी संतांचे समतावादी साहित्य’ आणि ‘फुले-शाहू-आंबेडकरी साहित्यप्रवाहाशी बांधीलकी’ या परिसंवादांद्वारे वैचारिक बैठक होणार आहे. संध्याकाळी ‘मिर्झा एक्सप्रेस’ सादरीकरण, ‘सन्माननीय षंढानो’ नाटक आणि राष्ट्रीय बहुभाषिक मुशायरा होणार आहे, ज्येष्ठ कवी सिराज शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली नामवंत कवी गझल सादर करणार आहेत.
दुसऱ्या दिवशी सकाळी ‘कथाकथन’ सत्राने सुरुवात होईल. अध्यक्ष अय्युब नल्लामंदू यांच्या मार्गदर्शनाखाली गौसपाशा शेख, डॉ. विलास काळे, डॉ. ज्ञानेश्वर गोरे आदी लेखकांच्या कथा सादर होतील. सूत्रसंचालन प्रा. सुरैय्या जहागीरदार करणार आहेत. त्यानंतर ‘मुस्लिमांचे शिक्षण – आरक्षण व प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद होईल, ज्याचे अध्यक्षस्थान नौशाद उस्मान भूषवणार आहेत. पुढील सत्रात ‘अल्पसंख्याकांवरील सांस्कृतिक-आर्थिक हल्ले आणि लोकशाही’ या विषयावर डॉ. अस्लम बारी, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, आणि प्रा. रामटेके विचार मांडतील.
दुपारी ‘सावित्री – फातिमाबीच्या लेकींचे कवीसंमेलन’ आकर्षण ठरणार आहे. अध्यक्षस्थानी तहसीन सय्यद असतील. डॉ. अर्जिनबी शेख, मीना भागवत, निलोफर फणीबंद, रजिया डबीर, सारिका देशमुख, नेहा गोडघाटे यांच्यासह अनेक महिला कवी कविता सादर करतील. दुपारी समारोप सत्रात अध्यक्षस्थानी पुन्हा डॉ. एस.एन. पठाण असतील. माजी खासदार हुसेन दलवाई, अॅड. अभिजीत वंजारी, प्रा. रणजीत मेश्राम, डॉ. आय. जी. पठाण या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. प्रास्ताविक डॉ. तांबोळी, ठराव वाचन हासीब नदाफ आणि आभार अय्युब नल्लामंदू करतील.