‘माझी वसुंधरा’ उपक्रमात पटकाविला विभागीय पुरस्कार
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
जिल्ह्यातील तब्बल आठ महिला सदस्य असलेल्या जरंडी ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट काम करून गावाचा चेहरा मोहरा बदलवून टाकत निसर्गाशी संबंधित उपक्रम गावात राबवित घनवृक्ष लागवड, हा प्रयोग यशस्वी करून मराठवाड्यात माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये मराठवाड्यात अव्वल स्थान पटकावून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ५० लाख रुपये मिळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सोयगावच्या जरंडी ग्रामपंचायतीचा झेंडा आता मराठवाडा भर रोवला गेला आहे.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत जरंडी ग्रामपंचायतने राबविले. त्यामध्ये घन वृक्ष लागवड अंतर्गत २५ हजार वृक्षांची गावात लागवड करून विक्रम प्रस्थापित केला. तसेच वृक्ष लागवडीसाठी इतर गावांना चालना देण्यासाठी ग्रामपंचायतीने रोपवाटिका उभारून इतर ग्रामपंचायतींना वृक्ष पुरवठा केला. तसेच संपूर्ण गाव भयमुक्त व भीतीमुक्त करण्यासाठी गावात विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसवून व्यायामशाळा, हुतात्मा स्मारक गार्डन, पक्षांची किलबिलाटची शाळा, संगीत कारंजे, विद्यार्थ्यांना अभ्यासिका, गावात चित्र रेखाटन आदी भरीव उपक्रम राबवून गावाचा चेहरा मोहरा बदलवुन गावच बदलवून टाकले. त्यामुळे ग्रामपंचायतला मराठवाड्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन्ही रणरागिणींचा सत्कार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरपंच स्वाती पाटील, वंदना पाटील या दोन्ही रणरागिणीचा सत्कार करण्यात येऊन ५० लाख रुपये पारितोषिक जाहीर झाले आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानात ग्रामपंचायतीने केलेल्या कामांचे डेस्कटॉप मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणामार्फत करण्यात आले.या दोन्ही मूल्यमापनमधील एकूण गुणांच्या आधारे विभाग स्तरावर जरंडी ग्रामपंचायतीची प्रथम पारितोषिकसाठी निवड केली आहे.
यांनी केला जल्लोष
याबद्दल सरपंच स्वाती पाटील, वंदनाताई पाटील, उपसरपंच संजय पाटील, नीलिमा पवार, द्वारकबाई राठोड, कल्पना मुठ्ठे, सलीमाबी तडवी, लिलाबाई निकम, चंद्रकला चौधरी, मधुकर पाटील, मधुकर सोनवणे, ग्रामसेवक सुनील मंगरुळे, संतोष पाटील, सतीश बाविस्कर, अंबु राठोड आदींनी जल्लोष केला.