कवली गावात सर्वेक्षणाला प्रारंभ
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
कवली गावात डेंग्यूसदृश तापाच्या संशयित महिलेचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मंगळवारी आरोग्य विभागाच्या तीन पथकांनी कवली गावात ताप रुग्ण सर्वेक्षण घेऊन पाच रुग्णांची रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे. दरम्यान, महिलेला बाहेरगावी तापाची लागण झाल्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. दुसरीकडे डेंग्यूसदृश तापामुळे आरोग्य विभाग हादरला आहे. त्यामुळे गावात सर्वेक्षणाला प्रारंभ झाला आहे.
आनंदाबाई सुकलाल अहिर (वय ५८) या महिलेचा डेंग्यूसदृश तापाने सोमवारी मृत्यू झाल्याचा अहवाल छत्रपती संभाजीनगर येथील खासगी वैद्यकीय सूत्रांनी मंगळवारी तालुका आरोग्य विभागाला पाठविला होता.मंगळवारी डास सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.कुंडलीकर यांनी कवली गावात भेट देऊन घटनेची पाहणी केली. कोरडा दिवस पाळा, असे आवाहन करण्यात आले. डॉ.गितेश चावडा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.स्नेहल वरांगणे, डॉ.विशाखा डुकरे यांच्यासह आरोग्य कर्मचारी कवली येथे तळ ठोकून होते. आरोग्य कर्मचारी यांनी सर्वेक्षण करून जिल्हा हिवताप विभाग छत्रपती संभाजीनगर कार्यालयाला अहवाल सादर केला.
आरोग्य विभागाच्या १२ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तीन पथकांनी गावात तापाच्या रुग्णांची सर्वेक्षण मोहीम राबवून किरकोळ १६ रुग्णांवर जागेवर उपचार केले आहे. दरम्यान, कवली गावातील पाणी पुरवठा यंत्रणेचे तीन पाणी नमुने व पाच रक्त नमुने तपासणीसाठी घेवून प्रयोगशाळेत पाठविले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाखा डुकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल वारंगणे यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकांकडून रात्री सात वाजेपर्यंत सर्वेक्षण सुरू होते.
कोरडा दिवस पाळावा
घरात साठविलेल्या पाण्यात डास अळी तयार होते. या डास अळीचा नायनाट करण्यासाठी आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गितेश चावडा यांनी ग्रामस्थांना केले आहे.