जळगाव ः प्रतिनिधी
केंंद्र सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यांनी केलेल्या गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात काल जळगावात महिला रस्त्यावर उतरल्या. राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी कार्यालयासमोर महिलांंनी रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापल्या. या आंंदोलनात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महिलांनी सहभाग घेतला.
गेल्या दीड महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरचे दर तब्बल २०० रुपयांंनी वाढले आहेत. ही दरवाढ अन्यायकारक असून, केंद्र सरकार पेट्रोलियम कंंपन्यांच्या फायद्यासाठी गॅस आणि पेट्रोलसारखी इंधन दरवाढ करीत आहे.गॅस दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. महिलांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप या वेळी महिलांनी केला.
आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील, प्रदेश उपाध्यक्षा वंंदना चौधरी, डॉ.सुषमा चौधरी, मीनाक्षी चव्हाण, लता मोरे, कमल पाटील, ममता तडवी, रईसा पटेल, सरला पाटील, कोमल महाजन, मनीषा गव्हारे, जुबेदा तडवी यांची उपस्थिती होती. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी सरिता माळी-कोल्हे, शोभा चौधरी यांच्यासह महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या.