साईमत जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेत शिक्षणशास्त्र, विद्यार्थी विकास विभाग आणि क्षमता निर्माण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आत्मनिर्भर युवती अभियान” या कार्यशाळेचा समारोप बुधवार दि. १० जानेवारी रोजी झाला.
समारोप प्रसंगी मंचावर जळगाव येथील भूमीअभिलेख कार्यालयाच्या उपअधिक्षक शीतल लेकुरवाळे, प्रशाळेच्या संचालिका डॉ. मनीषा इंदाणी, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. संतोष खिराडे व डॉ. स्वाती तायडे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना शीतल लेकुरवाळे यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश संपादन करण्यासाठी निश्चय करून आपल्या मनाशी खुणगाठ बांधणे गरजेचे आहे. प्रयत्नांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. प्रयत्नांमध्ये संपूर्ण समर्पण असणे आवश्यक असते तेव्हाच अपेक्षित यश साध्य करता येते. आपल्या प्रेरणात्मक व्याख्यानाच्या माध्यमातून Determination, Direction and Dedication हा यशाचा मंत्र त्यांनी दिला.
विद्यार्थिनी प्रियंका पवार हीने सहा दिवसाच्या कार्यशाळेचा आढावा सादर केला. मोनिका गावित हीने मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेत ७५ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. रणजित पारधे तर सहसमन्वयक म्हणून प्रणाली सोनवणे यांनी काम पाहिले.



