जालना : वृत्तसंस्था
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही, म्हणजे नाही, असा निर्धार मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे तसेच आता ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग, अशी शंकाही भुजबळांनी व्यक्त केली आहे. ते पंढरपुरात आयोजित करण्यात आलेल्या ‘ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलत होते. भुजबळांच्या या वक्तव्यांवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी दिले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असे युद्ध चालू आहे. यामुळे दोन्ही समाजाचे नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. मराठा समाज आणि ओबीसी समाजविरोधात शाब्दिक युद्ध सुरू झाल्याने दोन्ही समाजातील नेते एकमेकांवर टीका करतात. त्याचाच भाग म्हणून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले तर ओबीसीतूनच आरक्षण मिळवून दाखवणार असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला.
आमच्या घामाचे पैसे
“समोरच्या लोकांच्या मागण्या वाढत आहेत. त्यांची लेकरे बाळं गरीब असल्यानं आरक्षण पाहिजे. २०० जेसीबी आणि हेलिकॉप्टरमधून फुलांची उधळण करण्यात येते, तरीही ते गरीब आहेत,” अशी टीका भुजबळांनी केली होती. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, मराठे कर्ज काढतात, कष्ट करतात आणि वाहने घेतात. आमच्या घामाचे पैसे आणि घामाच्या गाड्या आहेत. लोकांचे पैसे लुबाडून छगन भुजबळ जेलमध्ये गेले होते. त्यांनी भानात राहू बोलावं.”
