जळगाव : प्रतिनिधी
विनाअट आदिवासी कोळी समाजाला जातीचे दाखले नोंदींवरून सरसकट मिळावेत, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, जातपडताळणी समितीचे कार्यालय कायमस्वरूपी जळगावात कार्यान्वित करावे यांसह 10 मागण्यांसाठी आदिवासी कोळी जमातीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.
आदिवासी कोळी जमातीचे पदाधिकारी जगन्नाथ बाविस्कर (चोपड़ा), नितीन कांडेलकर, संजय कांडेलकर (मुक्ताईनगर), नितीन सपकाळे (अंजाळे), पुंडलिक सोनवणे (भोकर), पद्माकर कोळी (यावल) यांनी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केले.
यावेळी डॉ. शांताराम सोनवणे, प्रभाकर सोनवणे (मोहाडी), डॉ. अश्विन सोनवणे, कैलास सोनवणे, शांताराम सपकाळे, डी. पी. साळूंखे, अशोक कांडेलकर, दशरथ कांडेलकर, श्रीधर सालुंखे, मुकेश सोनवणे, बाळासाहेब सैंदाणे, रविंद्र नंन्नवरे, आत्माराम कोळी, भरत सपकाळे (नगरसेवक), प्रभाकर सोनवणे, राजेंद्र रायसिंग, बी. टी. बाविस्कर, आंदोलन समन्वय समितीचे प्रभाकर सोनवणे, जितेंद्र सपकाळे, सुभाष सोनवणे, संदीप सोनवणे, खेमचंद कोळी, योगेश्वर बाविस्कर, हरलाल कोळी, भाईदास कोळी, दीपक तायडे, विशाल सपकाळे, प्रल्हाद सोनवणे, रणजीत सोनवणे, आकाश कोळी, किशोर शेवरे, संतोष कोळी आदी उपस्थित होते
सकाळी वाल्मीकनगरातील आद्यकवी महर्षी वाल्मीकी यांना वंदन करून पाचही उपोषणकर्त्यांची पायी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा टॉवर चौक, महापालिका, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, स्वातंत्र्य चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी पोहोचली. उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यासह जिल्हाभरातील हजारोबांधव पायी शोभायात्रेत सहभागी होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभामंडपात छोटेखानी सभा झाली. तेथे केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
उपोषणकर्त्यांनी सांगितले की, विनाअट आदिवासी टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जातीचे दाखले कोळी नोंदींवरून सरसकट मिळावेत. ज्या जातवैधता प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जातवैधता प्रमाणपत्र मिळावे. जातपडताळणी समिती जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर आहे; परंतु कार्यालय धुळे येथे आहे. ते कार्यालय कायमस्वरूपी जळगाव येथे करावे. आदिवासी कोळींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी स्वतंत्र महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या नावाने महामंडळ स्थापन करावे. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जातपडताळणी समिती असावी. कथित आदिवासी संघटनांचा हस्तक्षेप थांबवावा.
परराज्यातील रहिवाशांच्या जातवैधता रद्द कराव्यात. टीएसपी क्षेत्रातील कोळी नोंदींप्रमाणे लाभ मिळावा. आदिवासी कल्याण समितीतील आमदारांचा हस्तक्षेप थांबवावा. वादग्रस्त गोविंद गारे यांनी काढलेले अवैध परिपत्रक व शासन निर्णय रद्द करावा या मागण्या मान्य होईपर्यंत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन केले जात आहे. आंदोलनस्थळी जिल्ह्यासह राज्यभरातील समाज संघटनांचे पदाधिकारी, बांधवांसह महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.