साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील धरणगाव येथे आजुबाजूला मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत आहे. वाढत असलेल्या वस्ती तसेच गाव हे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या लगत असल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये अनेकदा किरकोळ प्रमाणात चोरी वा इतर प्रकार होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडातून किंवा वित्त आयोगाच्या फंडातून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, त्यामुळे गावातील अवैध व्यवसाय आणि इतर गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल. यासंदर्भात सरपंच, सचिव यांना सामाजिक कार्यकर्ते करण विनोद झनके यांच्यासह समस्त नागरिकांच्यावतीने नुकतेच निवेदन देण्यात आले.
किरकोळ चोरी वा इतर प्रकाराची माहिती कायद्याचा तगादा मागे लागू नये, म्हणून बऱ्याचदा पोलीस स्टेशनला तक्रार सुध्दा देत नाही. त्यामुळे गुन्हेगारांचे फावत आहे. सद्यस्थितीत चोरी वा इतर गुन्ह्याचे तसेच अवैध व्यवसायाचे प्रमाण वाढत आहे. त्यामधूनच नवनवीन गुन्हे घडत आहे. त्यामुळे गावात ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील मुख्य चौकात तसेच प्रत्येक वार्डात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले तर गुन्हेगारांची ओळख पटविण्यास मदत होईल. गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी उपयोग होईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.