नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेणे इष्ट आहे आणि निवडणूक खर्च कमी होण्यासारखे त्याचे अनेक फायदे आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी करणे हे व्यावहारिकदृष्टय़ा कठीण आहे, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एस कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केले. मात्र, एकत्र निवडणुका घेऊन पैसे आणि वेळ वाचवण्यास त्यांनी अनुकूलता दर्शवली.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना कृष्णमूर्ती म्हणाले की, एकत्र निवडणूक घेतल्यास, प्रचाराचा वेळ वाचणे, निवडणूक खर्च कमी होणे यांसारखे फायदे आहेत. त्याच वेळी ही कल्पना फार आकर्षक असली तरी व्यावहारिकदृष्ट्या त्याची अंमलबजावणी करणे आव्हानात्मक आहे, असा इशारा त्यांनी दिला. यामध्ये काही प्रशासकीय अडचणी आहेत, एकदम मोठा खर्च करावा लागेल, निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पुरेशी सशस्त्र दले आणि मनुष्यबळाची आवश्यकता असेल हे मुद्दे आहेत. तसेच यासाठी राजकीय सहमती घडवून आणणेही सोपे नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र घटनात्मक मुद्दे हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यावर उपाय शोधल्याशिवाय देशात एकत्र निवडणुका घेणे शक्य नाही असे ते म्हणाले.