सातारा ः वृत्तसंस्था
२०२४ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्ष लागले आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस आणि पवार यांचे सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याचा सत्ताधारी पक्षाकडून दावा करण्यात येत आहे. अशातच प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. २०२४ साली प्रहार संघटनेचे १० ते ११ आमदार निवडून येतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले, साताऱ्यातील माण-खटावमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. उमेदवाराचे नाव अद्याप ठरले नाही. २०२४ साली प्रहारचे १० ते ११ आमदार निवडून येतील. आम्ही बसलो, तर सरकार बसेल. आम्ही उठलो, तर सरकार उठून जाईल.
घटकपक्षांना दाबवण्याचे काम होत आहे का? या प्रश्नावर बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, घटक पक्षांना दाबण्याचं कारण संख्याबळ आहे. लोकशाहीत संख्येचं गणित असतं. एक किंवा दोन आमदार नसणाऱ्यांनी मला दाबण्याचं काम केलं जातलआहे, असे म्हणण्यात अर्थ नाही. संख्या महत्वाची असते. ज्यांची संख्या अधिक, त्याचं राज्य असते. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, अजित पवार पाचवेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत. पण, अद्यापही त्यांना मुख्यमंत्री होता आले नाही.