ज्येष्ठ उद्योजक आणि ‘सुहाना-प्रवीण मसालेवाले’चे संस्थापक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (९२) यांचे वृद्धापकाळाने आज (शुक्रवारी) निधन झाले. त्यांच्यामागे राजकुमार, डॉ. प्रवीण, प्रदीप, धन्यकुमार हे चार मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे माजी सभापती विशाल चोरडिया हे त्यांचे नातू होत.
हुकमीचंद यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३० रोजी नगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला. कमलबाई यांच्यासोबत लग्नानंतर काही काळ ते सोलापूर जिल्ह्यात वास्तव्याला होते. तेथे त्यांनी ‘आनंद मसाला’ हा घरगुती मसाले तयार करून विकला. नंतर, पुण्यात हडपसर परिसरात नोकरी करत असतानाच संध्याकाळी घरोघरी फिरुन मसाले विकलेत.
मिरची बियाणे विक्री करता करताच हुकमीचंद यांना मसाला तयार करण्याची कल्पना सुचली होती. ‘गरम मसाला’ आणि सोबतच ‘कांदा-लसूण मसाला’ तयार करुन घरोघरी विकणे सुरु केले. १९६० मध्ये त्यांनी ‘प्रवीण मसाले’ ची स्थापना केली. पहिली दहा वर्षे अत्यंत कठीण गेलीत. हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट येथेच त्यांनी मोठी जागा घेऊन १९७२ मध्ये व्यवसायाचा विस्तार केला. १९७६ मध्ये सुमारे ५०० किलो लोणचे तयार करुन त्यांनी ‘प्रवीण’ ची उत्पादने विक्रीसाठी आणली. त्या व्यवसायाचा विस्तार आता चौथी पिढी करत आहे. आज प्रवीणचे भारतभर दहा कारखाने आणि अनेक विक्री केंद्रे आहेत. ‘प्रवीण’ सोबतच त्यांचे ‘सुहाना’ आणि ‘अंबारी’ हे ब्रँड आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत.
ते परिचितांमध्ये ‘भाऊ’ म्हणून ओळखले जात. यांचा मित्रपरिवार मोठा होता. मसाले उद्योगातील स्पर्धक कंपन्यांमध्येही त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी अनेक नातेवाईकांना फूड प्रॉडक्ट्सचा व्यवसाय करण्यासाठीही भरभरुन सहकार्य केले. रुग्णालय, शैक्षणिक संस्था, समाजातील गरजू, सैनिक यांना ते नेहमी मदत करत.
१९८३ मध्ये लघुउद्योग महासंघाचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला होता. १९८४ आणि १९९३ मध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला होता. १९९१-९२ मध्ये आंबा महोत्सवामध्ये ‘प्रवीण लोणचे’ या उत्पादनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
जीवनावर चित्रपट, पुस्तक
प्रसिद्धीपासून दूर असलेले हुकमीचंद चोरडिया यांच्या जीवनप्रवासाचे चित्रण करणारे ‘बिकट वाट यशाची’ हे मधुबाला राजकुमार चोरडिया यांनी लिहिलेले पुस्तक लक्षणीय ठरले आहे. २०१२ मध्ये ‘सुहाना-प्रवीण मसालेवाले’ या उद्योगाला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त हुकमीचंद आणि कमलबाई त्यांच्या जीवनावर आधारित ‘मसाला’ हा मराठी चित्रपट लोकप्रिय ठरला होता.