जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्यासाठी ५०० कोटींची मागणी

0
11

जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मागील वर्षी सन २०२१-२२ या वित्तीय वर्षातील डिसेंबर २०२१ मध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात जळगाव जिल्ह्यातील तापी पाटबंधारे विकास महामंडळासाठी शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्यासाठी ठोक तरतूद (न्यायालयीन प्रकरणे ) अंतर्गत २५० कोटी रूपयांची तरतूद मंजूर केली होती. तो निधी उपलब्ध करून देण्यात यावा व तापी पाटबंधारे विकास महामंडळाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार यावर्षी 250 कोटी निधीची ठोक तरतूद ही आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मान्यता देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित करून जलसंपदा विभागाला लेखी स्वरूपात मागणी करून साकडे घातले.
दरम्यान, यावर कार्यवाहीचे आश्‍वासन मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लघु , मध्यम व मोठे प्रकल्पांसाठी जमीन संपादीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्यासाठी अनेकदा उपोषणे केली असून या संवेदनशील प्रश्‍नावर पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यामुळे या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वाढीव रकमेचा मार्ग मोकळा होणार झाला आहे.
या संदर्भात वृत्त असे की, गेल्या सुमारे १२ – १५ वर्षांमध्ये तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत अनेक लहान , मध्यम व मोठे प्रकल्पांसाठी शेकडो शेतकऱ्यांच्या जमीनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. यातील शेतकऱ्यांना मोबदला मिळाला असला तरी त्यांना वाढीव निकषांनुसार मोबदला मिळावा अशी मागणी त्यांनी केली होती. तापी पाटबंधारे विकास महामंडळा कडे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे भूसंपादन वाढीव मोबदल्यासाठी सुमारे 1587 कोटी रुपयांची मागणी 12-15 वर्षांपासून प्रलंबित होती. त्यापैकी सन 2021-22 या वर्षातील डिसेंबर 2021च्या हिवाळी अधिवेशना मध्ये तापी पाटबंधारे विकास महामंडळास भूसंपादनासाठी ठोक तरतूद अंतर्गत 250 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे मात्र अद्याप पर्यंत निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे निधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तगादा सुरु असून काही शेतकऱ्यांनी आंदोलने व उपोषण देखील केलेले आहे. अलीकडेच पालकमंत्र्यांणी उपोषण कर्त्यांची भेट घेतली असता त्यांनी या प्रकरणी तातडीने कार्यवाही करून शेतकर्‍यांना त्यांचा वाढीव मोबदला मिळवून दिला जाईल असे आश्‍वासन ना. गुलाबराव पाटील यांनी आश्वासन देऊन व उपोषण सोडवले होते.
या अनुषंगाने मंत्रीमंडळाच्या (कॅबिनेटच्या ) बैठकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा असणारा हा मुद्दा उपस्थित करून जलसंपदा विभागाला लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे. यात त्यांनी आधी जाहीर केल्यानुसार २५० कोटी रूपये तातडीने मिळण्यासह तापी पाटबंधारे विकास महामंडळाने सदर केलेल्या प्रस्तावानुसार आणखी २५० कोटी रूपयांची ठोक तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली. या मागणीला जलसंपदा विभागाने सकारात्मक भूमिका घेऊन लवकरच कार्यवाही करण्याचे सांगितले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना जमीनीच्या वाढीव मोबदल्यासाठी ठोक मोबदला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here