खबरदारीच्या उपायासाठी प्रशासनाने उघडले दरवाजे
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
यंदाच्या मान्सून हंगामात प्रथमच जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे ४६ पैकी ८ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. विदर्भात तसेच हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. पूर्णा नदीतून आलेला जलसाठा हतनुरमध्ये पोहोचल्याने, धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या तापी नदीत १० हजार क्युसेक्स प्रति सेकंद या गतीने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती हतनूर प्रशासनाने दिली.
यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पूर्णा नदीला पूर येऊन तिचे पाणी थेट हतनूर धरणात जमा होत आहे. पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने धरणाच्या सुरक्षिततेसाठी आणि संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दरवाजे उघडले आहेत.
तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पाणी विसर्गामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांसह शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये. तसेच जनावरे चराईसाठी नदीकाठी सोडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. अचानक पाणी पातळी वाढल्यास जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. सद्यस्थितीत पाण्याचा विसर्ग नियंत्रित स्वरूपात सुरू असला तरी पुढील काळात पावसाचा जोर वाढल्यास अधिक दरवाजे उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.