२५३ पोस्टर्स, १९ मॉडेलच्या माध्यमातून सादरीकरण
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित विद्यापीठ प्रशाळांसाठी पहिल्या टप्यातील आविष्कार २०२५ स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेत ४१८ संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. तसेच २५३ पोस्टर्स आणि १९ मॉडेलच्या माध्यमातून सादरीकरण केले.
विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात आविष्कार २०२५ स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा, अस्टेमो इंडिया प्रा. लि. कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर योगेश हेंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, व्यवस्थापन परिषद सदस्य, प्रा. पवित्रा पाटील, प्रा. जयदिप साळी, अधिसभा सदस्य नितीन ठाकूर, डॉ. कांचन महाजन, विद्यार्थी विकासचे संचालक जयेंद्र लेकुरवाळे, नवसंशोधन व नवउपक्रम साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, आविष्कारचे समन्वयक डॉ. नवीन दंदी, डॉ. संदीप भामरे, डॉ. अमरदीप पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी प्रेम कोगटा यांनी नाविण्यपूर्ण कल्पनांचा उत्सव म्हणजे आविष्कार सांगतांना विविध लोकाभिमुख शोधांचा आढावा घेतला. योगेश हेंबाळकर यांनी मनोगतात आविष्कारच्या माध्यमातून नवनवीन शोध लागतील आणि हे संशोधन समाजाला निश्चितपणे उपयुक्त ठरेल. अशा उपक्रमातूनच देशाची घोडदौड सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवनवीन वाटा शोधाव्यात, असे आवाहन केले.
आविष्कारच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिलेले आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने त्याचा उपयोग केल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या करीयरसाठी फायदा होईल, असा सल्ला अध्यक्षीय मनोगतात विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी यांनी दिला. प्रास्ताविक समन्वयक डॉ. नवीन दंदी, परिचय डॉ. संदीप भामरे, डॉ. अमरदीप पाटील, सूत्रसंचलन डॉ. प्रिती सोनी, डॉ. विजय घोरपडे तर आभार डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी मानले.
