प्रवासी अडकले, गॅस टँकर अपघाताने उपद्रव
साईमत/ पुणे /प्रतिनिधी
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी घडलेल्या गॅस टँकर अपघातामुळे तब्बल २२ तास उलटून गेले तरीही वाहतूक सुरळीत झालेली नाही. खंडाळा घाटातील बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली असून, सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
हा अपघात केवळ एक्स्प्रेस वेपुरताच मर्यादित न राहता जुन्या मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्गालाही फटका बसला आहे. दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून हजारो प्रवासी रात्रीपासून रस्त्यावरच अडकले आहेत. २२ तासांहून अधिक काळ वाहतूक न हलल्याने प्रवाशांचे हाल झाले असून खाणे-पिणे, पाणी आणि शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांचा तणाव निर्माण झाला आहे.
या जॅममुळे अनेक प्रवाशांची महत्वाची योजना प्रभावित झाली आहे. लातूरहून मुंबईकडे येणारे एक कुटुंब कर्करोगग्रस्त रुग्णाला टाटा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते. रात्री १० वाजता प्रवास सुरू करून सकाळी ८ वाजता रुग्णालयात पोहोचण्याचे उद्दिष्ट होते, परंतु पहाटे ४ वाजल्यापर्यंत ते वाहतूक कोंडीत अडकले आहेत. याशिवाय काही प्रवाशांचा विमान प्रवास होता, ज्यासाठी तिकीट रद्द करावे लागले.
वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये प्रशासनाविरुद्ध नाराजी आहे. सकाळी ७ वाजता या कोंडीत अडकलेल्या एका टेम्पो चालकाने सांगितले की, वाहतूक कोंडीबाबत कोणतीही पूर्वसूचना मिळाली नाही. “किमान एका बाजूची वाहतूक सुरू ठेवली असती, तर प्रवाशांना मदत झाली असती,” असे संतप्त प्रवाशांनी म्हटले. दीर्घकाळ अडकून राहिल्याने लहान मुले, वृद्ध आणि आजारी प्रवाशांची विशेष गैरसोय झाली आहे.
मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या गॅस टँकर पलटीनंतर रात्रीपासून पहाटे ४ वाजेपर्यंत गॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु ते यशस्वी झाले नाही. बुधवारी सकाळी पुन्हा प्रयत्न सुरू असून परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही.
एनडीआरएफची टीम, टाटा कंपनीचे तांत्रिक पथक आणि केमिकल तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले असून गॅस लिकेज रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे हेल्प फाऊंडेशन रेस्क्यू टीमचे गुरुनाथ साठेलकर यांनी सांगितले. तरीही गॅस गळती पूर्णपणे थांबवण्यात काही तास लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी प्रवाशांना मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. गॅस गळतीमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद असून पुण्याकडे जाणारी वाहतूकही खालापूर टोलनाक्यापर्यंत कोंडीत अडकली आहे. पर्यायी मार्ग म्हणून ताम्हिणी घाटमार्गे कर्जत–रायगड, माळशेज घाट आणि आळेफाटा–ठाणे मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
