साईमत मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रातील १६ आमदार अपात्र प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांंच्या दरबारी प्रलंबित आहे.मे महिन्यात सर्वोच्च न्यायालायने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केले. आज या प्रकरणावर तिसरी सुनावणी सह्याद्री येथे पार पडली. यावेळी सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आल्याची माहिती शिंदे गटाच्या वकिलांनी दिली आहे.सुनावणी संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आज तीन तास दोन्ही वकिलांचा युक्तीवाद झाला. आता यावर २० तारखेला निर्णय देण्यात येणार आहे तसेच ठाकरे गटाकडून सर्व याचिकांंवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी केली जात आह परंतु, या सर्व याचिका म्हणजे वेगवेगळे मुद्दे आहेत. वेगवेगळ्या घटना आहेत. त्यामुळे या सर्व याचिका एकत्र करून त्यावर सुनावणी घेणे कायद्याने योग्य नाही, असा आमच्याकडून युक्तीवाद करण्यात आला आहे”, असे शिंदे गटाचे वकील म्हणाले.
“बैठकींना हजर न राहणे, अध्यक्ष निवडीचा व्हीप न पाळणे, बहुमत सिद्ध करताना व्हीप न पाळणे या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.ज्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे त्या प्रत्येक आमदाराला बाजू मांंडण्याचा अधिकार आहे.या सर्व याचिका एकत्र केल्यास तो अधिकार राहणार नाही, असेही शिंदे गटाचे वकील म्हणाले.
अध्यक्षांना आम्ही विनंती केली आहे की, लवकरात लवकर सुनावणी घ्यावी. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील”, असेही शिंदे गटाचे वकील म्हणाले.