जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी,अधिकारी,अभियंंता संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य वीज कामगार कंंत्राटी संघटना कृती समितीनेही दोन दिवसीय संपाला आजपासून सुरुवात केली असून आपआपल्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करुन केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध केला.
वीज कंपन्यांमध्ये कार्यरत 27 संघटना आणि कंत्राटी कामगाराच्या सर्व संघटना यांच्यावतीने दि.28 च्या शुन्य तासापासून दोन दिवसाचा संप आज सकाळपासून पुकारण्यात आला असून त्याचे पडसाद उमटले आहेत. वीज कामगारांचा होणारा संप हा केंद्र व राज्य सरकारच्या वीज उद्योगांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावित धोरणांच्या विरोधात असल्यामुळे वीज ग्राहक व सामान्य जनता यांनी या संपात सहकार्य करावे असे आवाहन कर्मचारी संघटनाच्या वतीने करण्यात आले आहे. ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापन यांच्या बरोबरच्या वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने सर्व संघटनांचा 28-29 मार्चच्या दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून प्रत्यक्ष संपात सहभागी होत निदर्शने करण्यात आली.
विविध मागण्या अशा – देशांतील संपूर्ण वीज उद्योगाचे खाजगीकरण करण्याच्या दृष्ट हेतूने केन्द्र शासनाने एकतर्फी निर्णयाने आणलेले विद्युत (संशोधन) बील 2021 मागे घ्यावे,महाराष्ट्राच्या 6 जलविद्युत केन्द्राचे खाजगीकरण रद्द करावे, स्वतंत्र कृषी कंपनी निर्माण करण्याचा निर्णय मागे घ्यावा, तिनही कंपनीमध्ये तयार करण्यात आलेले एकतर्फी बदली धोरण रद्द करावे,30 हजार कंत्राटी कामगारांना वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरीचे संरंक्षण द्यावे, 40 टक्के पेक्षा जास्त रिक्त असलेल्या जागांवर कर्मचारी सरळ सेवा भरती करावी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचा आणि राजकीय वाढता हस्तक्षेप बंद करावा इत्यादी.